नाशिक – नाशिकच्या जागेवर आमचा दावा कायम आहे. आमच्याकडे अनेक उमेदवार आहेत, मात्र माघार घेतल्यानंतर मी नाराज नाही असे विधान मंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे. महायुतीच्या जागावाटपात भुजबळ यांनी नाशिकच्या जागेवरील दावा सोडल्यानंतर ही जागा शिंदे गटाला मिळाल्याचे बोलले जात आहे.
नाशिकच्या जागेसाठी शिंदे गटाकडून हेमंत गोडसे आणि अजय बोरस्ते इच्छुक आहेत. त्यातच ही जागा छगन भुजबळांनी लढावी, असा ठराव समता परिषद आणि ओबीसी संघटनांनी बैठकीत केला आहे. त्यामुळे महायुतीत नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या जागेवरून पुन्हा ट्विस्ट निर्माण झाला आहे.
बैठकीनंतर भुजबळ यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला आहे. ते म्हणाले, ”नाशिकची निवडणूक लढण्याचा महिलांचा आग्रह आहे. त्यांचे म्हणणे मी ऐकून घेतले. मी नाराज नाही. अनेकदा आयुष्यात काही गोष्टी येतात आणि काही गोष्टी जातात. ‘जो मिल गया उसको मुकद्दर समझ लिया जो खो गया उसिको भुलाता चला गया’ असे म्हणत भुजबळ यांनी नाराजीच्या चर्चा फेटाळल्या आहेत.
ते पुढे बोलतांना म्हणाले, ”समता परिषदेच्या कार्यकर्त्यांच्या भावनेचा मी आदर करतो. मात्र राजकारणात विविध विषय समोर येत असतात. आता मी निर्णय घेतला आहे. आयुष्यात एकदाच तिकीट मागितले. त्यानंतर माझ्यावर तिकीट मागण्याची वेळ आली नाही.
यावेळी त्यांनी दिल्लीतून सांगितले म्हणूनच मी तयारीला लागलो होतो. मात्र त्यांच्याही पुढे काही अडचणी आल्या असतील. त्यामुळे नाशिकचा तिढा सुटत नाहीये”, असे भुजबळ म्हणाले.