रांची – तेरा वर्षांपुर्वी आचार संहितेचा भंग केल्याच्या एका प्रकरणात बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दल प्रमुख लालू प्रसाद यादव यांना बुधवारी एका विशेष न्यायालयाने 6,000 रुपयांचा दंड ठोठावला आहे. 2009 च्या आचारसंहिता भंग प्रकरणातील गुन्ह्यात लालू प्रसाद यादव न्यायालयासमोर हजर झाले होते.
त्यांच्या याचिकेवर सुनावणी घेतल्यानंतर न्यायालयाने त्यांना 6000 रुपयांचा दंड ठोठाऊन खटला निकाली काढण्यात आला आहे. या प्रकरणात ते आता आरोपमुक्त झाले आहेत, त्यांना पुन्हा येथे येण्याची गरज नाही, असे लालू प्रसाद यादव यांचे वकील धीरेंद्र कुमार सिंह यांनी सांगितले.
दरम्यान, लालू यादव यांना किडनी प्रत्यारोपणासाठी परदेशात जावे लागणार असल्याने त्यांनी आपला पासपोर्ट नूतनीकरणासाठी देण्याची मागणी रांची येथील सीबीआय न्यायालयात केली.पासपोर्टचे नुतनीकरण झाल्यानंतर तो पुन्हा कोर्टात दाखल केला जाईल अशी हमी त्यांच्या वकिलांनी कोर्टात दिली आहे.