मतदारांचा प्रश्न : युतीच्या जागावाटपाचा तिढा सुटेना
“आमच ठरलंय’…”पुढंच सरकार युतीचच येणार’ असे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुखांकडून वेळोवेळी सांगण्यात येत आहे. परंतु, आतापर्यंत मुंबईत झालेल्या बैठकीत जागा वाटपाचा तिढा सुटला नाही. त्यामुळे मुंबईची बैठक दिल्लीपर्यंत गेली. त्यामुळे आता तरी तिढा सुटेल, युतीची घोषणा होईल, अशी शक्यता होती. मात्र, बुधवारचा दिवसही केवळ “आमच ठरलंय’ यावरच गेला. विधानसभा निवडणुकीचे बिगूल वाजताच युतीच्या घोषणेकडे इच्छुकांसह संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे. परंतु, गेल्या काही दिवसांपासून कोणी किती जागा लढवायच्या यामध्ये भाजपा आणि शिवसेनेचा तिढा सुटता सुटेना, अशी परिस्थिती आहे.
लोकसभा निवडणुकीत युतीचा 50-50 फॉर्म्युला होता. तोच विधानसभेला असेल आणि मित्र पक्षांसाठी भाजपनेच जागा द्याव्या अशी चर्चा शिवसेनेत सुरू होती. परंतु, हा फॉर्म्युला मान्य होणार नसून, आतापर्यंत झालेल्या बैठकांमध्ये अनेक “फॉर्म्युले’ पुढे आले आहेत. मात्र, अद्याप तिढा सुटलेला नाही. सध्या भाजप-160, शिवसेना 128 (मित्र पक्षाला भाजपच्या कोट्यातून), किंवा भाजप-153, शिवसेना-122 आणि मित्र पक्ष-13 अशी जागावाटप होण्याची शक्यता आहे. त्यामध्ये शिवसेना 125 च्या कमी येणार नसून, त्यावरच घोडे आडले असून, मित्र पक्षाचे काय? याबाबत अंतिम चर्चा सुरू आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसांत युतीची घोषणा होण्याची शक्यता आहे.
काही मतदारसंघांत मैत्रीपूर्ण लढत?
2014 मध्ये भाजप आणि शिवसेनेने स्वतंत्र निवडणूक लढवली होती. त्यामुळे शिवसेनेच्या अनेक इच्छुकांना आपली ताकद दाखविता आली. परंतु, यावेळी युती झाली, तर अनेक इच्छुकांना उमेदवारीपासून वंचित रहावे लागणार आहे. तर युतीच्या काळात शिवसेनेकडे असलेल्या जागा आता पुन्हा देणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. कारण, पुणे शहरातील आठही मतदारसंघात भाजपचे आमदार आहेत. युती झाल्यावर भाजप पुणे शहरातील किती जागा शिवसेनेला सोडणार? जागा सोडली नाही तर बंडखोरी होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे राज्यात अशा परिस्थितीत मैत्रीपूर्ण लढत होण्याची शक्यता आहे.