शिवसेनेकडून साहेबराव नवलेंची चर्चा
संगमनेर मतदारसंघ भाजपकडे जाणार का?
संगमनेरमध्ये कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरात यांच्या विरोधात सक्षम उमेदवार असणार याकडे संगमनेरकरांचे लक्ष लागले असतांना श्रमिक उद्योग समूहाचे अध्यक्ष साहेबराव नवले यांनी शिवसेनेकडून जोरदार तयारी सुरू केली आहे.
आमदार थोरात साडेतीन दशकांहून अधिक काळ आपले वर्चस्व गाजवत आहे. त्यांच्याविरुद्ध अनेकांची नावे गुलदस्त्यात आहेत. मात्र, आमदार थोरात यांच्याविरुद्ध नवले यांच्या नावाची चर्चा जोर धरू लागली आहे. त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत जोरदार लढतीने रंगत येणार आहे. कारण विधानसभा निवडणुकीत थोरातांचा कायमच वरचष्मा राहिला.
मात्र, लोकसभा निवडणुकीत शिवसेना उमेदवाराला मताधिक्य मिळते. याचा आपोआप फायदा नवले यांना होऊ शकतो असा राजकीय जाणकारांचा अंदाज आहे. त्यात नवले यांचे तालुक्यात मोठे प्राबल्य आहेत.
संगमनेर विधानसभा मतदारसंघ युतीच्या जागावाटपात शिवसेनेकडे आहे. विधानसभेतील जागावाटपावरून भाजप आणि शिवसेनेत सध्या जोरदार खलबतं सुरू आहेत. त्यात गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे यांनी या मतदारसंघात चांगलेच लक्ष घातले आहे. त्यामुळे शिवसेनेऐवजी भाजपचा उमेदवार या ठिकाणी असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. शिवसेनेकडे सक्षम उमेदवाराचा अभाव आहे.
त्यामुळे उमेदवार आयात करावा लागणार असल्याने भाजपने या ठिकाणी आपल्या पद्धतीने मोर्चाबांधणी सुरू केली आहे. लोकसभा निवडणुकीनंतर भाजपत प्रवेश करून गृहनिर्माण मंत्री झालेले राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार बाळासाहेब थोरात यांचा वाद सर्वश्रुत असून अनेक झालेल्या सभांमधून तो चव्हाट्यावर आले आहेत. त्यामुळे एकमेकांना राजकारणात तोंडघशी कसे पाडता येईल, यासाठी जोरदार प्रयत्न एकमेकांकडून होत आहेत.
विखे पाटील आता संगमनेर मतदारसंघात बैठका घेवून सक्रिय झाल्याने थोडी का होईना थोरातांना डोकेदुखी वाढली आहे. नवले आणि ना. विखे पाटील यांचे चांगले संबंध असल्याने विखे आता नवलेंना मदत करू शकतात अशी जोरदार चर्चा मतदारांत झडत आहे.
आतापर्यंत पाण्यावर चालू असलेले राजकारण पुन्हा एकदा कोकणातील पाणी गोदावरीत आणण्यासाठी कोण प्रयत्न करणार आणि निळवंडे कालवे यावरच हे राजकारण केले जाणार आहे. याबाबत सध्या दोन्ही नेत्यांमध्ये श्रेयवादाची लढाई सुरू आहे.