पुणे – देशात परदेशी विद्यापीठे येणार आहेत. “संशोधन’ ही या विद्यापीठाची जमेची बाजू आहे. परदेशी विद्यापीठाच्या तुलनेत आपण संशोधनात मागे आहोत. त्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या नाविन्यपूर्ण कल्पनांना गती मिळण्यासाठी विद्यापीठांमधील क्षमता आणि ज्ञानाचे आदानप्रदान होणे अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी विद्यापीठांमध्ये “इनोव्हेशन स्टडी सर्कल’ निर्माण करण्याची गरज आहे, असे मत राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी व्यक्त केले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे आयोजित पंधाराव्या महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठीय संशोधन संमेलन “आविष्कार-23’च्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी हे दूरदृष्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.
याप्रसंगी राष्ट्रीय कोशिका विज्ञान केंद्राचे संचालक डॉ. मोहन वाणी, कुलगुरू डॉ. कारभारी काळे, प्र-कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, आविष्कार समितीचे राजेश पांडे, डॉ. संजय ढोले आदी उपस्थित होते. खरा शास्त्रज्ञ हा शेतकरीच आहेत. तो नवनवे प्रयोग करीत असतो. त्यामुळे कृषी क्षेत्रात संशोधनाची गरज आहे, असे सांगत विखे पाटील म्हणाले, विद्यार्थ्यांमध्ये जागतिक स्तरावर स्पर्धा करण्याची क्षमता विकसीत व्हावी यासाठी विद्यापीठांनी उद्योगाभिमुख अभ्यासक्रम राबविण्यावर अधिक भर देण्याची गरज आहे. विद्यापीठाकडून जागतिक दर्जाच्या सुविधा निर्माण करण्यासाठी प्रस्ताव आल्यास त्यास शासन सहकार्य करेल. डॉ. मोहन वाणी म्हणाले, परदेशातील विद्यापीठांना संशोधनासाठी आवश्यक साधने तीन ते चार दिवसांत उपलब्ध केली जातात. मात्र भारतात संशोधनात्मक सुविधा उपलब्ध नाहीत.