मांजरी : महापालिका पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि पाणी पुरवठा करणाऱ्या ठेकेदाराचे संगनमताने मांजरी बुद्रुक येथील मांजराईनगर भागातील विविध झोपडपट्ट्यांमध्ये ठरल्याप्रमाणे पाणी पुरवठा होत नाही. असा आरोप आम आदमी पार्टीचे राजेंद्र साळवे यांनी केला असून याच्या निषेधार्थ पुन्हा एकदा बेमुदत धरणे आंदोलन करणार असा इशारा साळवे यांनी दिला आहे.
– पाणी पुरवठा कर्मचारी व ठेकेदाराचे संगनमत
– ठरल्याप्रमाणे पाणी पुरवठा होत नाही
– आम आदमी पार्टीचे बेमुदत धरणे आंदोलन
मांजरी बुद्रुक येथील मांजराईनगर भागातील ७२ घरकुल, ११६ घरकुल, सटवाई नगर, राजीव गांधी नगर ,वेताळ वस्ती, कुंजीर वस्ती ,माळवाडी इत्यादी भागासह गावठाण मध्ये पिण्याचे पाणी तसेच वापरण्याचे पाण्याचे हाल होत आहेत. येथील पाणी प्रश्न सुटावा यासाठी पुणे पालिकेसमोर चार ते पाच वेळा आंदोलने झाली आहेत. त्यानंतर दररोज ८ टँकर मंजूर झाले. याशिवाय ५० टाक्याचे टेंडर काढण्यात आले. परंतु संबंधित पाणीपुरवठा अधिकारी व ठेकेदार यांचे संगनमतामुळे आजवर ५० टाक्या बसवण्यात आल्या नाहीत. तसेच नियमितपणे ८ टॅंकर पाणी पुरवठा ही होत नाही. असा आरोप आम आदमी पार्टीचे प्रभाग अध्यक्ष राजेंद्र साळवे यांनी केला आहे.
पाणी साठवणूक करण्यासाठी ५०टाक्या बसवण्यात येणार होत्या याशिवाय दररोज १० ते १२ टॅंकर पाणी पुरवठा केला जाणार होता. मात्र, संबंधित विभागाने फक्त २५ ते ३० टाक्या या परिसरात बसवलेल्या आहेत. उर्वरित टाक्या का बसवण्यात आल्या नाहीत ? असा सवालही साळवे यांनी उपस्थित केला आहे.
“मांजरी बुद्रुक येथील या भागात ५० टक्के पाण्याच्या टाक्या बसवण्यात आल्या आहेत. साधारपणे ३० टाक्या बसवण्यात आल्या आहेत. अजून २० टाक्या बसवण्याचे काम बाकी आहे.तर, दररोज दहा ते बारा टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे.
– सुभाष पावरा(लष्कर पाणी पुरवठा विभाग महापालिका)
सध्या ८ टँकरही नियमितपणे येत नाहीत. आलेल्या टॅंकर पैकी काही टँकर लोकांना पाणी न देताच विहिरीत पाणी टाकून पसार होतात. तर काही टँकर हे ठरवून दिलेल्या भागाशिवाय इतर भागात पैसे देऊन पुरवले जातात. त्यामुळे या झोपडपट्टी मधील गरीब लोकांना नियमितपणे पिण्याचे पाणी मिळत नाही. संबंधित पाणीपुरवठा कर्मचारी मात्र वेळोवेळी तक्रारी करूनही जाणून बुजून त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतात.
Gram Panchayat Election : भाजप-शिंदे गटाच्या जास्त जागा आल्या,ते धादांत खोटे – अजित पवार
त्यामुळे वापरण्याचे पाणी मांजराई नगर भागात पुरेसे व वेळेवर मिळत नाही. त्यामुळे या भागातील लोक खूपच त्रस्त झाले असून. या विरोधात महापालिकेसमोर बेमुदत धरणे आंदोलन करणार आहे. असा इशारा राजेंद्र साळवे यांनी दिला आहे.