Arvind Kejriwal – केंद्र सरकारने एका निर्वाचित मुख्यमंत्र्यांची तिहार कारागृहात हत्या करण्याचा कट रचला आहे, असा आरोप आम आदमी पक्षाने आज पुन्हा एकदा केला आहे. या पक्षाचे नेते आणि दिल्लीचे मंत्री सौरभ भारद्वाज यांनी हा आरोप केला आहे.
तिहार तुरुंगात असलेले अरविंद केजरीवाल यांच्या मधुमेहावरील उपचारांबाबत अक्षम्य हेळसांड सुरू असल्याचा आरेापही त्यांनी केला.
ते म्हणाले की, भाजपचे लोक तिहार तुरूंगात पुरेशी वैद्यकीय व्यवस्था असल्याचा दावा करीत आहेत.
परंतु तेथे मधुमेही कैद्यांवर उपचार करणारा तज्ज्ञच नेमलेला नाही. आता केजरीवालांचे प्रकरण आम्ही लाऊन धरल्यानंतर तिहारच्या प्रशासनाने एम्सकडे पत्र पाठवून येथे मधुमेह तज्ज्ञ डॉक्टरांची नेमणूक करण्याची विनंती केली आहे, असे भारद्वाज यांनी नमूद केले.
भारद्वाज म्हणाले की, तिहार तुरुंगाच्या महासंचालकांनी एम्स रूग्णालयाला तिहारमध्ये डायबेटिओलॉजिस्टची नेमणूक करण्याची विनंती करणारे पाठवलेले पत्र, तिहारमध्ये पुरेशा वैद्यकीय सुविधा असल्याच्या दाव्यांचे खंडन करते.
काल हे पत्र देण्यात आले आहे त्याची प्रतही भारद्वाज यांनी पत्रकार परिषदेत सादर केली.केजरीवालांवर मधुमेहाशी संबंधीत उपचारच केले जात नसून त्यांना इन्सुलिनही दिले जात नाही. त्यासाठी त्यांना कोर्टात धाव घ्यावी लागते, असे ते म्हणाले.
अरविंद केजरीवाल २०-२२ वर्षांपासून मधुमेहाने त्रस्त आहेत. ते १२ वर्षांपासून इन्सुलिनवर आहेत. एकदा रुग्ण इन्सुलिनवर गेला की, त्याची साखर केवळ इन्सुलिननेच नियंत्रित केली जाऊ शकते. परंतु त्यांना ते नाकारले जात आहे. हे अरविंद केजरीवाल यांना हळुहळू मारण्याचे षडयंत्र नाही का? असा सवाल त्यांनी केला.