कोथरूड, दि. 8 (प्रतिनिधी) -“गुरूवार आला की शहरासह उपनगरातील पाणीपुरवठा बंद’, हे समीकरण संपूर्ण शहराला माहित आहे. मात्र, वारजे, कर्वेनगर भागात गुरूवार संपला तरीही पाणीपुरवठा सुरळीत झालेला नाही. मागील तीन दिवसांपासून या भागातील पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याने नागरिकांचे हाल सुरू आहेत. पाणी कधी येणार, आले तर ते कितीवेळ असेल याची शाश्वती नाही. याबाबत पाणीपुरवठा करणारे कर्मचारी, अधिकारी यांना संपर्क साधला तर त्यांचे फोनही नॉट रिचेबल आहेत, त्यामुळे पाण्यासाठी आम्ही जायचे कुठे? असा संतप्त प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
अधिकाऱ्यांचा फोन लागत नाही म्हटल्यावर नागरिकांनी स्थानिक लोकप्रतिनिधींकडे धाव घेत तक्रारी केल्या आहेत. मात्र, त्यांच्याही घरी पाणी आलेले नाही, तेही अधिकाऱ्यांना फोन करून दमले आहेत, अशी अवस्था पहायला मिळत आहे. गुरूवारी (दि. 6) कर्वेनगर, वारजे, कोथरूड, बावधन परिसरात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होणार नसल्याचे महापालिकेकडून जाहीर करण्यात आले. या परिसरात एलएनटी कंपनीच्या वतीने पाणी पुरवठा करणाऱ्या पाइपलाइनचे काम सुरू होते, गुरुवारी या उपनगरात पाणी पुरवठा होणार नव्हता.
याबाबत एलएनली कंपनीचे अधिकारी नंदकिशोर जगताप म्हणाले की, आमच्या कंपनीच्या माध्यमातून पाणी पुरवठा पाइपलाइनचे काम सुरू आहे. कर्वेनगर, वारजे, कोथरूड आणि बावधन येथील पाइपलाइनचे काम एकच दिवसाचे होते. परंतु, कर्मचाऱ्यांना शुक्रवारचा दुसरा दिवस उजाडला. त्यामुळे शुक्रवारी पाणी पुरवठा होऊ शकला नाही. त्यामुळे नियोजन ढासळले यातून आज शनिवारीही पाणी पुरवठा कमी दाबाने झाला.
कर्वेनगर, वारजे भागातील डहाणूकर कॉलनी, वनदेवी परिसर, हिंगणे होम कॉलनी, काकडे सिटी परिसर, आकाशनगर, चौधरी नगर कॅनाल रोड परिसर, माळवाडी परिसरातील डोंगररांग याठिकाणीही पाणी पुरवठा सुरळीत झालेला नाही. त्यामुळे संतप्त नागरिकांनी अधिकाऱ्यांसह लोकप्रतिनिधींना भंडावून सोडले. एक दिवस पाणी नाही म्हटल्यावर घरातील पाण्याचे नियोजन करू शकतो. परंतु, सलग तिसऱ्या दिवशीही पाणीपुरवठा सुरळीत होत नाही, याला जबाबदार कोण? संबंधितांवर कारवाई व्हावी, अशी मागणी संतप्त नागरिकांकडून करण्यात आली.
पाणीपुरवठ्यासाठी अनेक एजन्सी काम करतात. गुरूवारी काही अत्यावश्यक कामामुळे पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला. त्यावेळी फ्लो मिटर बसविणे, यासह अन्य आवश्यक कामे हाती घेण्यात आली. मात्र, त्यातील काही कामे वेळेत पूर्ण झाली नाहीत. तसेच, विद्युत पुरवठाही विस्कळीत झाल्यामुळे टाकीमध्ये पुरेस पाणी भरले गेले नाही. त्यामुळे या भागात पाणीपुरवठा करण्यास उशीर झाला. आज, उपलब्ध पाण्यामध्ये कर्वेनगर भागात टप्याटप्याने पाणी सोडण्यात आले. तर रविवारी या भागातील पाणीपुरवठा पूर्णपणे सुरळीत होईल.
– विश्राम देव, वरिष्ठ अधिकारी, महापालिका पाणीपुरवठा विभाग