श्रीकांत कात्रे
संकट आले की माणूस कोलमडून जातो. संकटाचा धीराने सामना करून स्वतःबरोबर इतरांना सावरण्याचे काम सोपे नसते. मात्र, ते कठीणही नसते, हे अश्विता मोहिते यांनी सिद्ध करून दाखविले. करोनाच्या संकटात त्यांची नोकरी थांबली. कुटुंबाच्या उपजिविकेचाच प्रश्न निर्माण झाला. त्या काळात चिकनच्या व्यवसायाला सुरवात करून त्यांनी घराला सावरले. आता त्यांचा कुकुटपालनाचा व्यवसाय हळूहळू स्थिर होण्याच्या मार्गावर आहे. मात्र, त्यांचा संघर्ष संपलेला नाही. स्वतःचा व्यवसाय पुढील काळात त्यांना वाढवायचाही आहे…
चिपळूण तालुक्यातील सावर्डे गावाजवळील खरवडी येथील कॉलेजवर शिपाई म्हणून काम करणाऱ्या अश्विता आत्माराम मोहिते यांनी धैर्याने संकटाचा सामना करीत आपल्या कुटुंबाच्या आर्थिक स्थिरतेसाठी संघर्ष केला. करोनामुळे देशभरात लॉकडाऊन सुरू झाले आणि अनेकांपुढे रोजच्या जगण्याचे प्रश्न निर्माण झाले. हातावर पोट असणाऱ्यांपुढे उदरनिर्वाहाची चिंता होती. या संकटातून आश्विता यांचे कुटुंबही भरडले गेले. कॉलेज बंद झाल्यामुळे त्यांची नोकरी थांबली.
पती मजुरी करायचे, ती मजुरीही थांबली. मुलगा मुंबईत नोकरी करायचा त्याची नोकरी गेली. मुलगा आणि सून मुंबई सोडून घरी आले. कामधंदा बंद झाला. घरात पाच सहा माणसांचे निभवायचे कसे, असा प्रश्न निर्माण झाला. रोजच्या जेवणाच तरी भागले पाहिजे अशी स्थिती निर्माण झाली. त्यातच घरातील काही सदस्य करोना पॉझिटिव्हआले. अशा संकटाने कोणीही गडबडून जाते. अशा वेळी काही सुचत नाही. पण जगणे थांबत नाही. जगण्यासाठी मार्ग शोधण्याची वेळ येते. क्वारंटाइनचा काळ संपल्यावर अश्विता यांनी डगमगून न जाता पर्याय शोधला.
दोन हजार रुपये उसने घेऊन मुलाच्या मदतीने चिकनचा व्यवसाय सुरू केला. सुरवातीला चिकनच्या व्यापाऱ्याकडून 50 गावठी पिल्ले आणली आणि व्यवसायाला सुरवात केली. अशा काळातील संघर्ष खूपच मोठा असतो. कुटुंबाचा रोजचा किमान खर्च भागविण्याची धडपड होती. गावठी पिल्लांबरोबर बॉयलर सुरू केले. पिल्ले आणायची, मोठे पक्षी तयार करायचे. चिकनच्या विक्रीसाठी धडपड सुरू राहिली. त्यातून रोज 50 रूपयेसुटायला लागले. लॉकडाऊनच्या काळात तेच उत्पन्न घराचा आधार बनले. हळूहळू व्यवसाय वाढू लागला. रोजच्या उत्पन्नात थोडी वाढ होऊ लागली.
अगदीच आर्थिक स्थिरता मिळत नव्हती. परंतु, खायचा प्रश्न बऱ्यापैकी सुटला होता. हाच व्यवसाय किफायतशीर वाटू लागल्याने तोच व्यवसाय वाढविण्याचे त्यांनी ठरविले. पण जागेचा आणि भांडवलाचा प्रश्नही होताच. एका बॅंकेकडून अडीच लाखांचे कर्ज घेतले. पोल्ट्री भाड्याने घेतली. चारशे पक्षी आणले. नव्या जोमाने व्यवसाय सुरू केला.
पोल्ट्रीचे भाडे द्यायचे, पिलांचे संगोपन, लाईट, पाणी इतर बिले भरायची, त्यातून मिळेल त्या नफ्यातून घराचा गाडा चालवायचा, असे चक्र सुरू झालं. त्यादरम्यान माणदेशी फाउंडेशनची माहिती समजली. एक महिला असा संघर्ष करीत जागण्यासाठी धडपडतेय, हे पाहून माणदेशी फाउंडेशनने मदतीची भूमिका घेतली. प्रोत्साहन देण्यास सुरवात केली. व्यवसाय वाढविण्यासाठी माणदेशीनं पॉंम्प्लिटस, बॅनर तयार करून दिली. वेळेत मदत मिळाली. आता करोना काळ कमी झाल्यावर सारे निर्बंध कमी झाले. सावर्डेच्या सह्याद्री शिक्षण संस्थेचे कॉलेज सुरू झाले. अश्विता यांची नोकरीही पूर्ववत सुरू झाली आहे. कॉलेजचे काम सांभाळून कुकुटपालनाच्या व्यवसायात त्या लक्ष घालत आहेत. पक्ष्यांची संख्या वाढली आहे.
मुलगा या व्यवसायत स्थिर झाला आहे. मुलाची मदत असली तरी या व्यवसायातून अधिक उत्पन्न मिळावे, यासाठी अश्विता कष्ट घेत आहेत. त्याशिवाय त्या विणकामही करतात. हाताने तोरण तयार करणे, ताटावरचा रुमाल विणणे, स्वेटर, टोपी, मोजे विणणे असे धागे जोडून कलाकृती तयार करण्याची कलाही त्यांच्याकडे आहे. महिलांकडे अशी एखादी उपजत कला असतेच. त्या कलेतून निर्माण होणाऱ्या कलाकृतींचा मनसोक्त आनंद महिला घेत असतात.
अश्विता यांचेही तसेच झाले. त्यांच्याकडे कला होती. त्याचा आनंद त्या घेत होत्या. आतापर्यंत त्याबाबत त्यांचा व्यावसायिक दृष्टीकोन नव्हता. संकट समोर उभे राहिले की कुटुंबासाठी या कलेचा उपयोग आर्थिक उत्पन्नासाठी केला. विणकामातून तयार केलेल्या वस्तूमंधूनही उत्पन्न मिळू लागले आहे. यालाही गावातून तसेच परिसरातूनही मागणी वाढू लागली आहे. कोविडसारख्या संकटात भलेभले डगमगून गेले. अशा संकटावेळी महिला खंबीरपणे उभ्या राहिल्या.
धैर्याने संकटाशी झुंज देत आशादायी चित्र निर्माण केले. अश्विता त्यापैकीच एक. आता स्वतःची पोल्ट्री असावी आणि पोल्ट्रीत एक हजार पिल्ले असावीत, असे त्यांचे स्वप्न आहे. महिलांमध्ये जिद्द असते. आपण काहीही करून संकटावर मात केली पाहिजे, स्वतः आणि कुटुंब सावरले पाहिजे, या जिद्दीने हिंमत दाखवत अश्विता यांनी केलेला प्रवास प्रेरणादायी आहे.