पुणे – खडकवासला धरणातून पाणी घेण्यासाठी महापालिकेने जलवाहिनीवर बसविलेले मीटर वारंवार बंद पडत असल्याची तक्रार जलसंपदा विभागाने केली आहे. त्यामुळे पाण्याची उचल मोजण्यात अडचणी येत असून जलसंपत्ती नियामन प्राधिकरणाच्या आदेशानुसार पालिकेने अल्ट्रॉसॉनिक पाणी मीटर बसवावे, असे पत्र देण्यात आले आहे. त्यामुळे आधी थकबाकी नंतर पाणी करार आणि आता मीटरवरून नवीन वादाला सुरुवात करण्यात आली आहे.
राज्यशासनाच्या मंजूर कोट्याप्रमाणे वर्षाला 11.50 टीएमसी पाणी महापालिकेस मंजूर केले आहे; पण उन्हाळ्यातील पाण्याची वाढती मागणी लक्षात घेऊन ऑक्टोबर 2018 मध्ये झालेल्या कालवा समिती बैठकीत शहराला 1,350 एमएलडी पाणी देण्यास मंजुरी दिली आहे.
महापालिकेकडून हे पाणी धरणस्थळाच्या ठिकाणी असलेल्या जॅकवेल, कोपरा कोटी तसेच वारजे जलशुद्धीकरण प्रकल्प-1 आणि 2 साठी बंद पाइपलाइनद्वारे घेण्यात येते. या सर्व ठिकाणी पाणी मोजण्यासाठी पाणी मीटर बसविले आहेत. मात्र, हे मीटर वारंवार बंद पडत असून पाणी मोजण्यास अडचणी येत असल्याच्या तक्रारी जलसंपदा विभागाने सुरू केल्या आहेत. दरम्यान, एका बाजूला अवघ्या सहा महिन्यांपूर्वीच या मीटरवरील आकड्यांचा आधार घेत पालिका जादा पाणी वापरत असल्याचा दावा करून जादा बिलह पाठविण्यात आले होते. त्यामुळे आधी चांगले असलेले मीटर अचानक खराब कसे झाले, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
पालिकेने दोन वर्षांत हे मीटर बसविले असून त्यासाठी सुमारे 25 ते 30 लाख रुपयांचा खर्च केला आहे. तसेच हे मीटर सुस्थितीत असून त्याच्या आकड्यांच्या आधारावरच जलसंपदा विभाग पालिकेस बिले पाठविते. ही बिले अचूक असल्याचेही त्यांनी यापूर्वी थकबाकीच्या सुनावणीत स्पष्ट केले आहे. त्यामुळे मीटर बदलण्याचा प्रश्नच नाही. तसेच त्यांची सूचनेनुसार मीटरची पुन्हा एकदा तपासणी केली जाईल. मात्र, ते बदलण्याची गरज नाही.
व्ही. जी. कुलकर्णी , विभाग प्रमुख, पाणीपुरवठा, मनपा.