सातारा -ऑक्टोबर महिना आला तरी पावसाने दडी मारल्याने माण, खटाव, फलटण तालुक्यांवर दुष्काळाचे सावट असून सद्यपरिस्थितीत जिल्ह्यातील 78 गावे व 369 वाड्यांना टॅंकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. माण, खटाव व फलटण तालुक्यांतील 72 गावे व 369 वाड्यांचा यामध्ये समावेश आहे. जिल्ह्यात 19 विहिरी व 32 बोअरवेल प्रशासनाने अधिग्रहित केल्या आहेत.
जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्यापासून टंचाईची परिस्थिती निर्माण झाली होती. त्यानंतर प्रशासनाने अनेक ठिकाणी टॅंकरद्वारे पाणी पुरवठा सुरु केला होता. सर्वच तालुक्यांमध्ये कमी अधिक प्रमाणात टॅंकरची गरज निर्माण झाली होती. जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात पावसाने हजेरी लावली असली तरी हा पाऊस फक्त पश्चिम भागात झाल्याने अद्यापही अर्धा जिल्हा पावसाच्या प्रतीक्षेत आहे. सध्या माण, खटाव, फलटण, कोरेगाव या तालुक्यांवर दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे. मध्यंतरी काही प्रमाणात पाऊस झाला असला तरी हा पाऊस खूप कमी आहे. माण तालुक्यात 45 गावे, 309 वाड्यांना टॅंकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.
जिल्ह्यात सातारा, जावळी, महाबळेश्वर, खंडाळा, पाटण, कराड, वाई तालुके वगळता अन्य तालुक्यांमध्ये 78 गावे व 369 वाड्यांना टॅंकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. एक लाख 25 हजार 753 नागरिक आणि 76 हजार 706 पशुधनाची तहान या पाण्यावर अवलंबून आहे, अशी माहिती ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता गौरव चक्के यांनी दिली. माण तालुक्यात 41 गावे 309 वाड्या, खटाव 21 गावे, 24 वाड्या, फलटण 10 गावे, 36 वाड्या, कोरेगाव 6 गावे अशा 78 गावे 369 वस्त्यांवर टॅकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे. जिल्ह्यात शासकीय 8 आणि 83 खासगी टॅंकरद्वारे नागरिकांना पाणीपुरवठा करण्यात येत असल्याचे गौरव चक्के यांनी सांगितले.