Water Board Scam : दिल्लीतील केजरीवाल सरकार आणि केंद्र सरकार यांच्यात नेहमीच आरोप-प्रत्यारोप होताना पाहायाला मिळतात. त्यातच आता भाजपने पुन्हा एकदा दिल्लीतील आम आदमी पार्टीच्या सरकारवर मोठा घोटाळा केल्याचा आरोप लावला आहे. भाजपचे प्रवक्ते गौरव भाटिया यांनी पत्रकार परिषदेत आम आदमी पार्टीच्या दिल्ली सरकारवर हल्लाबोल केला आहे. नवी दिल्ली जल बोर्डातील घोटाळ्याबाबत भाजपचे प्रवक्ते गौरव भाटिया यांनी अनेक दावे केले आहेत. त्यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर अनेक घोटाळ्यांचे आरोप केले आहेत. भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून भाजप सातत्याने आम आदमी पक्षाला कोंडीत पकडत आहे.
भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते गौरव भाटिया यांनी पत्रकार परिषद घेत हा आरोप केला. त्यांनी यावेळी, “10 सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांच्या बांधकामात घोटाळा झाला आहे, त्यातील काही अपग्रेड करायचे होते, तर काहींची क्षमता वाढवण्याची योजना होती, त्यासाठी कंत्राटदारांना कंत्राट देण्यात आले होते, त्याची अंदाजित किंमत चुकीची होती. सुमारे 1500 कोटी रुपये अशी किंमत होती. आणि हाच घोटाळा झाला आहे. अंदाजे खर्च १५०० कोटी रुपये असताना १९५० कोटी रुपयांना कंत्राट देण्यात आले असल्याचे त्यांनी म्हटले.
तसेच ही बाब अत्यंत चिंताजनक आहे. “भ्रष्टाचार, लबाडी आणि फसवणूक या कलेत प्रभुत्व मिळवणारा कोणी राजकारणी असेल तर तो अरविंद केजरीवाल आहे.” असे म्हणत त्यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप लावले.
भाजपचे प्रवक्ते गौरव भाटिया पुढे म्हणाले, “मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याकडे कोणतीही सरकारी योजना आली तर ते नक्कीच भ्रष्टाचारात अडकतील, याचा विश्वास मला आहे. तसेच “अरविंद केजरीवाल जी, मला विचारायचे आहे की, तुम्ही भ्रष्टाचारात पीएचडी धारक असाल, तर भाजपही एक शाळामास्तर आहे जो प्रामाणिकपणे सार्वजनिक समस्या मांडतो.” असे त्यांनी म्हटले. तसेच गौरव भाटिया यांनी, अरविंद केजरीवाल इतके मोठे घोटाळेबाज आहेत की त्यांचे पोट भरत नाही.” असे म्हटले.