नांदेड : राज्यात जवळपास महिनाभराच्या प्रतिक्षेनंतर पावसाचे आगमन झाले आहे. अनेक भागात जोरदार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे अनेक प्रकल्पात पाणीसाठा वाढतान पाहायला मिळत आहे. दरम्यान, नांदेड शहराची तहान भागवणाऱ्या विष्णुपुरी धरणात देखील पाणीसाठा वाढला असून, सध्या विष्णुपुरी धरणात 84 टक्के पाणीसाठा असल्याने नांदेडकर सुखावले आहेत. या पाणीसाठ्यामुळे नांदेडकरांची उन्हाळ्यातील पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे.
नांदेड जिल्ह्यात जून महिना अगोदरच कोरडाच गेला त्यात जुलै महिन्यात काही प्रमाणात पाऊस झाला होता. विशेष जुलै महिन्यात काही भागात अतिवृष्टी झाली. त्यामुळे अनेक प्रकल्पात पाणीसाठा वाढला. दरम्यान, विष्णुपुरी धरणात सुद्धा जलसाठा वाढला. मात्र पुढे ऑगस्ट महिना पुन्हा कोरडा गेला. त्यामुळे नांदेडसह संपूर्ण राज्याचे लक्ष पावसाकडे लागले होते. त्यातच गेल्या दोन-तीन दिवसांत पुन्हा सक्रीय झालेल्या पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला. तसेच विष्णुपुरीत देखील पाण्याची वाढ झाली आहे.
सध्या या धरणात 84 टक्के पाणीसाठा असून, नांदेडकरांची उन्हाळ्यातील पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे. अनेक भागांत तब्बल 20 ते 25 दिवसांनंतर जोरदार पाऊस झाल्यामुळे शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे. मागील काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे शेतामधील कोवळी पिके काही ठिकाणी पिवळी पडण्याच्या मार्गावर होती. मात्र गुरुवारी पडलेल्या समाधानकारक पावसामुळे शेतामधील सोयाबीन, तूर, उडीद, मुग, कापूस यासह भाजीपाल्याच्या पिकांना निश्चितच बहर येणार असल्याचे शेतकरी वर्गातून बोलल्या जात आहे. पुढील काही दिवसांत जर पाऊस पडला नसता तर खरीप हंगाम हातून जाण्याची भीती होती.
नांदेड जिल्ह्यातील अखेर 6 आणि 7 सप्टेंबर रोजी पावसाला सुरुवात झाली. जवळपास 20 दिवसांनंतर वरुण राजाचे आगमन झाले. विशेष म्हणजे आगामी काही दिवसांत मुसळधार पावसाची शेतकरी बांधवास प्रतीक्षा आहे, कारण खरीप हंगामातील पिकांना मोठ्या प्रमाणात सध्या पावसाची गरज आहे.