-ब्रिगे. हेमंत महाजन (निवृत्त)
सीमेवर पुष्कळ सैन्य एकत्र केल्यानंतर भारतीय सैन्य आणि सरकार घाबरून जाईल आणि वाटाघाटी करण्यास चीनकडे विनंती करेल, अशी चीनची अटकळ होती. मात्र, असे झाले नाही. चीनच्या युद्धनीतीचे तिन्ही प्रकार यशस्वी झाले नाही. त्यामुळे भारताने एकप्रकारे चीनला हा जोरदार धक्काच दिला आहे.
चीनने 14-15 जूनला कर्नल बाबूंवर प्राणघातक हल्ला करून भारतावर मानसिक दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र, गलवानमध्ये झालेल्या लढाईत 100 हून जास्त चिनी सैनिक मारले आणि चीनलाच मोठा धक्का बसला. त्यानंतर 27-28 ऑगस्ट आणि 31 ऑगस्टला भारताने आक्रमक कारवाई करत एलएसीवर चिनी सैन्याच्या वरील भागात असलेल्या डोंगरमाथ्यावर भारतीय सैन्य तैनात केले.
सर्वात महत्त्वाची घटना 7 सप्टेंबरला घडली. पॅगॉंगसो तलावाच्या दक्षिण भागात भारतीय सैन्याने ब्लॅक टॉप शिखरावर कब्जा केला. 1962 च्या युद्धात चीनने भारताकडून हे शिखर काबिज केले होते. त्यासाठी 82 चिनी सैनिकांना प्राण द्यावे लागले होते. भारताने मात्र कोणतीही किंमत न चुकवता हे शिखर ताब्यात घेतले. त्याचा चीनला मोठाच धक्का बसला आहे.
युद्ध लढण्याचे तीन भाग
चिनी सैन्याच्या युद्ध लढण्याच्या पद्धतीचे तीन भाग करता येतील. पहिल्या भागामध्ये ते मोठ्या प्रमाणात शत्रूवर (भारतावर) मानसिक युद्ध लादतात, वेगवेगळ्या पद्धतीने घाबरवण्याचा प्रयत्न करतात. दुसऱ्या भागात शत्रू देशातील आपल्या हस्तकांमार्फत वेगवेगळे लेख लिहून त्या देशाला भ्यायला भाग पाडतात. त्यानंतरही यश मिळाले नाही तर आपल्या भूभागावर सैन्याची प्रचंड प्रमाणावर जमवाजमव करून आम्ही तुमच्यावर हल्ला करणार आहोत, असे चित्र निर्माण करतो, जेणेकरून ते राष्ट्र घाबरून त्यांच्याशी वाटाघाटी करेल.
भारताला जेरीस आणण्यामध्ये पूर्ण अपयशच
चीनने ही तिहेरी पद्धत वापरून भारताला जेरीस आणण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यामध्ये त्यांना पूर्ण अपयशच आलेले आहे. म्हणून आता चिनी सामरिक तज्ज्ञ ज्यामध्ये चिनी सैन्याचे जनरल, इतर सामरिक तज्ज्ञ आणि त्यांचे राजकीय नेतृत्व हे यावर गांभीर्याने विचार करताहेत. त्यांना एक गोष्ट स्पष्टपणे कळली आहे की, भारताविरोधात चीनच्या लढण्याच्या तिन्ही पद्धती अयशस्वी ठरल्या आहेत. चीन सैन्याने मान्य केले आहे की, भारताची ताकद म्हणजे त्यांचे लष्कर आणि लष्करी अधिकारी, तर चीनची ताकद म्हणजे सीमा भागात तयार झालेले रस्ते आणि इतर पायाभूत सुविधा त्यामुळे चिनी सैन्याला सीमेवर वेगाने सैन्य तैनात करणे सोपे जाते.
शेकडो रणगाडे, चिलखती वाहने, 50 ते 60 हजार सैन्य चीनने लडाखमध्ये आणले. त्याचा भारतीय लष्करावर काहीही परिणाम झालेला नाही. उलट भारताने प्रतिहल्ला करण्याची तयारी ठेवली. काही चिनी तज्ज्ञ असेही म्हणतात की, भारताने स्वसंरक्षणार्थ कारवाई केली. त्यांचा चीनवर आक्रमण करण्याचा उद्देश नाही. भारतीय लष्कराने जो गोळीबार केला तो चीनच्या जमिनीवर कब्जा करण्यासाठी नव्हता. भारतीय सैन्य पुन:पुन्हा इशारा देत आहे की, चिनी सैन्याने पुन्हा हल्ला केला तर मात्र आम्ही नक्कीच आक्रमक प्रत्युत्तर देऊ. काही तज्ज्ञांचे मत असेही आहे की, आता सीमेवर जी तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे त्याचा फायदा देखील होऊ शकतो. तो म्हणजे सध्याच्या तणावग्रस्त परिस्थितीतूनही दोन्ही देशांना आपापसातील संबंध सुधारण्याची संधीही मिळू शकते. भारतीय सैन्य चीन आणि पाकिस्तान दोन्ही देशांसाठी लढण्यास तयार आहे. कारण गेली 70 वर्षे सीमारक्षण हेच आपले धेय्य आहे; परंतु चीनचे सैन्य केवळ सीमेवर गस्त घालण्यासाठी किंवा पेट्रोलिंगसाठी येते.
भारताने 2 लाखांपर्यंत सैन्य भारत-चीन सीमेवर तैनात केले आहे. त्यामुळे चिनी सैन्याने हल्ला करायचे ठरवले, तर डोंगराळ भागात रक्षण करणाऱ्या सैनिकांविरोधात 9 ते 12 पट सैनिक वापरावे लागतात. त्यामुळेच काहींचे म्हणणे आहे की, अशा परिस्थितीत फायदा भारतास होणार आहे. कारण हे युद्ध खूप उंचीवर म्हणजे 15 ते 17 हजार फूट उंचीवर होईल. तिथे भारतीय सैन्य लढण्यासाठी तयार आहे. त्यामुळे या भागात चीनने हल्ला केला तर लढाई जिंकण्यासाठी चीनला जीवतोड प्रयत्न करावे लागतील.
चीनने जवळपास एक ते दीड लाख सैन्य भारतीय सीमेवर एकत्रित केले आहे. म्हणून 1962 सारखा हल्ला करू शकतात. मात्र, हा हल्ला भारतीय सैन्य रोखेल आणि प्रतिहल्ला करेल. चीनकडे हल्ला करण्याची क्षमता आहे मात्र, इच्छा शक्ती दिसत नाही. तरीही भारतीय सैन्याला हिवाळ्यात अतिथंड व अतिउंच भागामध्ये लढाई करण्याची तयारी ठेवावीच लागेल.