-राहुल गोखले
तमिळनाडू विधानसभा निवडणुकांना अद्यापि सहा-सात महिन्यांचा अवकाश असला तरीही सत्ताधारी अण्णा द्रमुक पक्षाने आपल्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवाराची घोषणा करून टाकली आहे. विद्यमान मुख्यमंत्री ई. पलानीस्वामी हे त्या पक्षाचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार असतील. यामागची कारणमीमांसा…
विद्यमान उपमुख्यमंत्री ओ पनीरसेल्वम यांच्या गटाच्या मागणीनुसार आगामी निवडणुकांसाठी पक्षांतर्गत अकरा सदस्यीय सुकाणू समिती नेमण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे. त्यामुळे त्या पक्षातील दोन प्रमुख गटांतील सामंजस्य कायम राहील अशी अपेक्षा आहे. अर्थात सहा-सात महिन्यांचा अवकाश असताना मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवाराची घोषणा करण्यामागे केवळ दोन्ही गटांनी एकत्र राहावे एवढाच उद्देश नाही. त्यामागे आणखीही व्यूहरचना आहे आणि ती म्हणजे या दोघांऐवजी आयत्या वेळी शशिकला यांनी रिंगणात उतरून सगळी सूत्रे स्वतःकडे घेऊ नयेत ही. अण्णा द्रमुकमधील दोन्ही गटांनी आतापासूनच एकत्र राहण्याच्या आणाभाका घेतल्या असल्या तरी त्यात पक्षाचे हित असण्यापेक्षा आपापल्या गटाचे हित जपले जावे ही भावना अधिक प्रबळ आहे यात शंका नाही.
अर्थात या व्यूहरचनेने निवडणुकांत अण्णा द्रमुक बाजी मारणार का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल कारण तो पक्ष निवडणुकांत जयललिता यांच्या मृत्यूनंतर निवडणुकांना सामोरा गेलेला नाही. तेव्हा आहे ती सत्ता टिकविण्यात त्या पक्षाला यश आले असले तरी पुन्हा सत्ता मिळविणे ही निराळी बाब असते आणि म्हणूनच पलानीस्वामी आणि पनीरसेल्वम यांची कसोटी लागणार आहे.
वस्तुतः दाक्षिणात्य आणि त्यातही तमिळनाडूचे राजकारण हे कायम चित्रसृष्टीतील दिग्गजांभोवती फिरत राहिले आहे. मग आंध्र प्रदेशात एन. टी. रामराव असोत किंवा तमिळनाडूमध्ये एम. जी. रामचंद्रन, करुणानिधी आणि जयललिता असोत. एम. जी. आर. यांच्या निधनानंतर अण्णा द्रमुकमध्ये झालेल्या सत्तेच्या रस्सीखेचीनंतर अखेर जयललिता यांच्याकडे पक्षाची सूत्रे आली आणि नंतर त्यांनी सत्ताही मिळविली. द्रमुककडे करुणानिधी होते आणि त्या दोन्ही पक्षांदरम्यान कमालीची कटुता होती. त्याचे पडसाद परस्परांच्या नेत्यांना अटक करून तुरुंगवास घडविण्यापर्यंत उमटत असत. त्या राज्यात सत्तेचे राजकारण गेल्या काही वर्षांत त्या दोन पक्षांभोवती आणि त्यातही जयललिता आणि करुणानिधी या दोन नेत्यांभोवती फिरत राहिले आणि त्या अटीतटीच्या संघर्षामुळे सलग दोनदा एकाच पक्षाला सत्ता केवळ अपवादानेच मिळाली.
2016 च्या विधानसभा निवडणुकीत अण्णा द्रमुकला सलग दुसऱ्यांदा सत्ता मिळाली. मात्र, जयललिता यांच्या निधनाने पक्षासमोर नेतृत्वाचा प्रश्न उभा राहिला. जयललिता यांच्या निकटवर्तीय असणाऱ्या शशिकला यांनी मुख्यमंत्री होण्यासाठीही खटाटोप चालविला होता. मात्र, भ्रष्टाचारप्रकरणी न्यायालयाने त्यांना शिक्षा ठोठावली आणि त्यांची रवानगी तुरुंगात झाली. चार वर्षांची शिक्षा भोगून शशिकला यांची लवकरच तुरुंगातून सुटका होईल आणि त्या स्वतः आता निवडणूक लढवू शकतील की नाही याविषयी शंका असली तरीही आपला भाचा दिनकरन याच्या मार्फत सत्तेची सूत्रे आपल्याकडे घेण्याची त्यांची इच्छा राहील. दिनकरन यांनी नुकतीच दिल्लीत जाऊन भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतल्याची वृत्ते प्रसिद्ध झाली होती. तेव्हा भाजपच्या दबावाखाली अण्णा द्रमुकला शशिकला यांच्याकडे सत्तेची सूत्रे द्यावी लागावीत यासाठीही दिनकरन यांची ही चाल असू शकते.
पलानीस्वामी आणि पनीरसेल्वम यांनी अण्णा द्रमुकमध्ये गटबाजी होऊ नये याची व्यवस्था केली त्याला ही पार्श्वभूमी आहे. याचे कारण शशिकला यांच्याशी पनीरसेल्वम आणि पलानीस्वामी या दोघांशी असलेले वितुष्ट. जयललिता यांच्या निधनावेळी पनीरसेल्वम हे काळजीवाहू मुख्यमंत्री होते. मात्र, शशिकला यांच्याविरोधात त्यांनी बंड केले. तेव्हा शशिकला यांनी आपली तुरुंगात रवानगी होण्याअगोदर पलानीस्वामी यांच्याकडे मुख्यमंत्रिपद सोपविले.
अर्थात आता मधल्या काळात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. पनीरसेल्वम यांनी आपला गट अण्णा द्रमुकमध्ये विलीन करून उपमुख्यमंत्रिपद मिळविले आणि पलानीस्वामी यांनी शशिकला यांचे नेतृत्व एका प्रकारे नाकारत आणि पनीरसेल्वम यांच्याशी हातमिळवणी करीत मुख्यमंत्री म्हणून आपले स्थान बळकट केले. अण्णा द्रमुकमधील दोन गटांमधील हा तकलादू का होईना, पण समझोता जयललिता यांच्या अनुपस्थितीत देखील सरकार तारून नेण्यास उपयुक्त ठरला आहे आणि म्हणूनच शशिकला यांच्या सुटकेनंतर त्यांचा हस्तक्षेप होण्यास वाव राहता कामा नये म्हणून कदाचित अण्णा द्रमुकने मुख्यमंत्रिपदाच्या नावाची घोषणा करून टाकली असावी. एका अर्थाने शशिकला यांच्या मनसुब्यांना पलानीस्वामी आणि पनीरसेल्वम यांनी सुरुंग लावला आहे असेच म्हटले पाहिजे. प्रश्न एवढाच आहे की, या सगळ्या क्लृप्त्यांनी सत्ता टिकविता येईल का?
अण्णा द्रमुककडे ज्याप्रमाणे वलयांकित नेता नाही तद्वत द्रमुककडेही करुणानिधी यांच्या निधनामुळे वलयांकित नेता नाही. मतदारांमध्ये प्रस्थापितांविरोधी असंतोष एवढ्या निकषावर अण्णा द्रमुकचा पराभव झाला तर द्रमुकची सत्ता अवश्य येऊ शकते, कारण अन्य पक्ष त्या राज्यात फारच दयनीय अवस्थेत आहेत. कॉंग्रेस आणि भाजप यांना स्वतःचा मतदारवर्ग त्या राज्यात तयार करता आलेला नाही आणि दोन्ही राष्ट्रीय पक्ष प्रादेशिक पक्षांवर विसंबून असतात. कमल हसन यांनी राजकारणात थोडी खळबळ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचा दबदबा निर्माण झालेला नाही.
रजनीकांत यांनी आपण निवडणुकांच्या राजकारणात येऊ इच्छितो किंवा नाही याविषयी स्पष्ट भूमिका घेतलेली नाही. शिवाय रजनीकांत आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रिंगणात उतरलेच तरीही तमिळनाडू आता चित्रपटसृष्टीतील दिग्गजांच्या मागे जाण्याच्या मनस्थितीत आहे की नाही हे सांगता येणार नाही. रजनीकांत यांच्याकडे संघटन देखील कितपत आहे हीही शंकाच आहे. तेव्हा प्रबळ पर्यायांच्या अनुपस्थितीत द्रमुक आणि अण्णा द्रमुक हेच पक्ष सत्तेचे प्रबळ दावेदार ठरतात.
2017 च्या विधानसभा निवडणुकीत जरी अण्णा द्रमुक आणि द्रमुकला मिळालेल्या जागांमध्ये अंतर होते तरी नंतर काही आमदारांना अपात्र ठरविण्यात आल्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत द्रमुकने अण्णा द्रमुकपेक्षा अधिक जागा जिंकून आपले बलाबल वाढविले होते. तेव्हा अण्णा द्रमुकने मुख्यमंत्रिपदाच्या नावाची घोषणा केली असली तरीही याचा अर्थ त्यांनी अर्धी लढाई जिंकली आहे, असे नाही. फार तर पक्षांतर्गत संघर्ष टाळण्याचा आणि तिसऱ्या कोणाचा प्रवेश रोखण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे एवढे म्हणता येऊ शकते.
एक खरे कोणत्याही वलयांकित नेत्याशिवाय होणारी आणि एकमेकांचे कट्टर राजकीय वैरी असणाऱ्यांच्या अनुपस्थितीत पार पडणारी तमिळनाडूतील ही पहिलीच निवडणूक असेल. यात प्रत्यक्षाहून प्रतिमा मोठी असणारे नेते दोन्ही प्रमुख पक्षांकडे नाहीत. एका अर्थाने द्राविडी राजकारणातील हा नवा अध्याय असणार आहे.