-माधव विद्वांस
“मालगुडी डेज’ या गाजलेल्या मालिकेचे कथा लेखक आर. के. नारायण यांचा आज जन्मदिन. त्यांचा जन्म 10 ऑक्टोबर 1906 रोजी चेन्नई येथे झाला. त्यांचे वडील शाळेत मुख्याध्यापक होते. त्यांना 6 मुलगे आणि दोन मुली होत्या. त्यामध्ये ते तिसऱ्या नंबरचे अपत्य होते. नारायण यांचे लहान भाऊ आर. के. लक्ष्मण हे प्रसिद्ध व्यंगचित्रकार होते.
त्यांच्या वडिलांची सतत बदली होत असल्यामुळे त्यांचे लहानपण आजीजवळच गेले. आजी त्यांना खूप गोष्टी सांगायची, त्यातूनच लेखनाचे बीज रोवले गेले. त्यांना वाचनाची खूप गोडी लागली. त्यांचे शालेय शिक्षण मद्रास येथील लुथेरिअन मिशन स्कूल, सीआरसी हायस्कूल आणि द ख्रिस्तीयन कॉलेज हायस्कूल येथे झाले. वडिलांची बदली म्हैसूर येथे झाल्याने ते महाविद्यालयीन शिक्षणासाठी म्हैसूरला आले. सुरुवातीस प्रवेश परीक्षेसाठी ते इंग्रजीमध्ये नापास झाले विशेष म्हणजे कालांतराने ते इंग्रजी लेखक म्हणून प्रसिद्धीस आले.
ते म्हैसूर येथे पदवी परीक्षा पास झाले व शिक्षक म्हणून काम करण्यास सुरुवात केली. तेथे त्यांना शारीरिक शिक्षण शिकविण्यास सांगितल्याने त्यांनी शिक्षकी पेशा सोडून दिला. लेखन हेच आपले कार्यक्षेत्र चांगले होऊ शकेल, असे वाटल्याने त्यांनी लेखनावर लक्ष केंद्रित केले.
ते सामाजिक विचारांना बांधलेले “जस्टिस’ या वर्तमानपत्राचे वार्ताहर झाले. वर्ष 1939 मध्ये त्यांच्या पत्नीचे आजाराने निधन झाले त्याचा त्यांना मोठा धक्का बसला. त्यांना हेमा नावाची मुलगी होती. त्यानंतर त्यांनी दुसरा विवाह केला नाही.
ते इंग्रजी वर्तमानपत्रातून तसेच नियतकालिकातून लेखन करू लागले. त्याचवेळी त्यांनी “स्वामी आणि मित्र’ ही पहिली कांदबरी लिहिली. ते हस्तलिखित ऑक्सफोर्ड येथील मित्राकडे पाठविले. या मित्राने लेखक ग्रॅहम ग्रीन यांना हस्तलिखित दाखवले. ग्रीनने आपल्या प्रकाशकाला पुस्तकाची शिफारस केली आणि कादंबरी वर्ष 1935 साली प्रकाशित झाली.
“मालगुडी’ नावाचे काल्पनिक गाव निर्माण करून गावातील निरनिराळ्या स्वभावाच्या व्यक्तिरेखा, मुलांचा खोडकरपणा, त्यांचे भावविश्व अत्यंत सुंदर रितीने मांडले आहे. त्यांचे लिखाण जगातल्या अनेक भाषांमध्ये भाषांतरित झाले आहे. त्यांनी “मालगुडी डेज’, “द गाइड’, “द मॅन-ईटर ऑफ मालगुडी’ या पुस्तकांचे लेखन केले. वर्ष 1937 मधील त्यांच्या महाविद्यालयीन अनुभवावर “द बॅचलर ऑफ आर्टस्’ ही त्यांची दुसरी कादंबरी होती. त्यानंतर वर्ष 1938 मध्ये जुलमी पुरुष आणि शोषित स्त्रीच्या आयुष्यावर आधारित “द डार्क रूम’ ही तिसरी कादंबरी त्यांनी लिहिली.
त्यांच्या पहिल्या तीन पुस्तकांमध्ये नारायण यांनी सामाजिक परिस्थिती, विद्यार्थ्यांची होणारी परवड तसेच रुढी परंपरा व त्याचा स्त्रियांना होणारा त्रास यावर प्रकाश टाकला होता. दरम्यान, वर्ष 1937 मध्ये त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यांच्या आजीने सांगितलेल्या गोष्टींवरून “द ग्रॅंडमदर्स टेल’ ही त्यांची अखेरची कादंबरी. वर्ष 1965 साली “गाइड’ हा चित्रपट त्यांच्या वर्ष 1958 मध्ये लिहिलेल्या “द गाइड’ या इंग्रजी कादंबरीवर आधारित होता. त्यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार तसेच शासनाने पद्मविभूषण पुरस्कार देऊन गौरव केला. 13 मे 2001 रोजी त्यांचे चेन्नई येथे 94व्या वर्षी निधन झाले.