अनिल काटे
वाई -जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यासह वाई तालुक्यात “अनलॉक’मध्ये काही निर्बंध शिथिल केल्यानंतरही करोनाच्या भीतीने प्रवासी वर्गाने एसटीच्या “लालपरी’कडे अजूनही पाठ फिरवल्याचे दिसत आहे. प्रवासी वाहतुकीला शासनाची परवानगी मिळाल्यानंतर वाई आगारातील बसेस हळूहळू फलाटावर उभ्या राहू लागल्या आहेत; परंतु त्यांना अजूनही प्रवाशांची प्रतीक्षा आहे. अशा परिस्थितीतही प्रवाशांच्या सेवेसाठी चालक-वाहक कामावर हजर झाले असले तरी मनमानी कारभार करणारे अधिकारी व त्यांच्या मर्जीतले हस्तक धारेवर धरत आहेत. त्यामुळे चालक-वाहकांचे मानसिक संतुलन बिघडल्याचे चित्र सध्या वाई आगारात आहे.
करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर देशभरात लागू झालेल्या लॉकडाऊनमुळे सलग चार-पाच महिने बाजारापेठेतील सर्व व्यवहार ठप्प झाले होते. त्यामध्ये सर्वसामान्य जनतेच्या हक्काची, एसटीची “लालपरी’ची चाकेही जागेवर रुतून पडली होती. दररोज हजारो प्रवाशांना अन्य शहरांसह खेडोपाडी, डोंगरकपारीतील वस्त्यांपर्यंत इच्छित स्थळी सुखरूप पोहोचवणाऱ्या एसटी बसेसना ब्रेक लागला होता. एरवी हायवे ,अवघड घाटमाथ्यावर, खड्ड्यांच्या, अडगळीच्या रस्त्यांवर गोरगरिबांना सोबत घेऊन धावणारी ही लालपरी करोनापासून माणसांच्या बचावासाठी लॉकडाऊनमध्ये सहभागी झाली होती.
चार-पाच महिने एसटी महामंडळाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल होताच, वाई आगारातील एसटी बसेस फलाटांवर येऊन प्रवाशांच्या प्रतीक्षेत उभ्या रहात आहेत. सध्या वाई-पुणे, वाई-सातारा, वाई-महाबळेश्वर, वाई-वाठार अशा काही फेऱ्या सकाळी, दुपारी व सायंकाळी सुरू झाल्या आहेत; परंतु एरवी गजबजलेल्या बसस्थानकात अजूनही गर्दी होतनाही. शाळा, महाविद्यालये अजूनही बंद असल्याने तालुक्याच्या ग्रामीण भागात धावणाऱ्या लालपरीची चाके अजूनही खोळंबलेलीच आहेत. त्यामुळे पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत प्रवाशांच्या गलक्याने दणाणून जाणाऱ्या वाई आगाराच्या परिसरात स्मशानशांतता आहे.
त्यातूनही काही वाहक-चालक मुंबईत आठ-दहा दिवस मुक्कामी जाऊन करोनाच्या भयावह संकटात गैरसोयींचा सामना करत आपले कर्तव्य बजावत आहेत, तरीही ते अधिकाऱ्यांच्या निशाण्यावर आहेत, असे बोलले जात आहे. शाळा, कॉलेजेस बंद, प्रमुख बाजारपेठांमध्ये गर्दी नाही, लहान-मोठे उद्योगधंदे व प्रशासकीय कार्यालये अजूनही करोनाच्या विळख्यात असल्याने शहरांकडे प्रवास करण्याचे धाडस कोणीही करताना दिसत नाही. त्याचा परिणाम एसटीच्या उत्पन्नावर झाला आहे. चालक-वाहक जीवाचा धोका पत्करून कामावर रुजू होत असले त्यांची कदर वाईच्या आगार व्यवस्थापनाला नाही. अधिकाऱ्यांच्या व त्यांच्या मर्जीतील हस्तकांच्या दादागिरीला कर्मचाऱ्यांना सामोरे जावे लागत आहे. याची शहानिशा होणे गरजेचे आहे.