वाघोली (दत्तात्रय गायकवाड,प्रतिनिधी) : पुणे महानगरपालिकेत हवेली तालुक्यातील तेवीस गावांचा समावेश झाला आहे या 23 गावांमध्ये पुणे महानगरपालिकेची वार्ड रचना होऊन याठिकाणी नगरसेवक पदासाठी निवडणूका रंगणार आहेत. दुसरीकडे तेवीस गावांचा समावेश पुणे महानगरपालिकेत झाल्याने उर्वरित गावांमधील पंचायत समित्या व जिल्हा परिषदांच्या निवडणुकांसाठी गण व गट लोकसंख्येच्या प्रमाणानुसार बदलणार असल्याचे चित्र दिसून आले आहे.
पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत नव्याने समावेश झालेल्या तेवीस गावांमध्ये तसेच इतरही गावांमध्ये पंचायत समिती जिल्हा परिषद व पुणे महानगर पालिकेत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार याद्या अद्यावत करण्यासाठी हरकती व तक्रारीचा महसूल विभाग तसेच निवडणूक विभागाकडे आल्या असून त्याबाबत नागरिकांचा पाठपुरावा वाढला आहे. मतदार यादीतील अनेक त्रुटी दूर करण्यासाठी महसूल विभाग, निवडणूक विभाग देखील नागरिकांच्या तक्रारीची दखल घेत कामाला लागल्याचे चित्र दिसून आले आहे. त्यामुळे वाघोली सारख्या अनेक गावात सद्या निडणुकीच्या यादीतील काही मतदारांची नावे मतदार यादीत वारंवार समाविष्ट होत असल्याने सध्या नागरिकांमध्ये या नावांबाबत मोठ्या प्रमाणात चर्चा निर्माण होऊ लागली आहे व त्यांची पडताळणी होण्यासाठी निवडणूक विभाग कामाला लागला आहे. तसे आदेश निवडणूक निर्णय अधिकारी यांनी मंडल अधिकारी, बी एल ओ यांना दिले आहेत.
नवीन मतदार नोंदणी मधील अडचणी ….
वय वर्ष अठरा पूर्ण झालेल्या तरुण युवकांना मतदानाची संधी उपलब्ध व्हावी व त्यांचे नाव मतदार यादीत समाविष्ट व्हावे यासाठी अनेकांनी ऑनलाइन पद्धतीने नोंदणीसाठी फॉर्म भरले आहेत. मात्र काही ठिकाणी मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी एकच मोबाइल क्रमांकावरून जास्तीत जास्त मतदार यादीत नवीन मतदारांचे फॉर्म भरले गेले असल्याचे दिसून आले आहेत. नवीन मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी काही राजकीय मंडळींनी आपल्या कार्यालयात मुले बसून हे फॉर्म भरले असल्याबाबत ची चर्चा नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
मतदार यादी मध्ये नाव समाविष्ट करण्यासाठी काही ठिकाणी ऑनलाइन पद्धतीने जोडण्यात आलेली कागदपत्रे जसे की लाईट बिल इतर पुरावे हे संबंधित व्यक्तीचे नसून दुसऱ्याच व्यक्तीचे जोडल्या गेल्याचा प्रकार देखील काही प्रमाणात दिसून येऊ लागल्याने काही नावाबाबत विशेष करून काही नागरिकांकडून हरकती येऊ लागल्या आहेत. एकच घर किंवा जागेवर त्या जागेत जागेची कागदपत्रे जोडून जास्तीत जास्त नावे मतदार यादीत समाविष्ट करण्याचा प्रकार देखील घडला असल्याची चर्चा देखील मोठ्या प्रमाणात आहे.
मतदार यादीत मयत व्यक्तींचे नाव वारंवार मतदार यादीत समाविष्ट होत असल्याचे यापूर्वी देखील उघड झाले आहे. ती समाविष्ट नावे कमी करण्यासाठी देखील हरकती मोठ्या प्रमाणात आल्या आहेत. जवळपासच्या गावांमधील नागरिकांची नावे ही मोठ्या लोकसंख्येच्या गावांमधील तसेच प्रतिष्ठेच्या निवडणुकीच्या मतदार संघात समाविष्ट झाल्याने अनेक जवळपासच्या गावांमधील नावांबाबत नागरिकांकडून निवडणूक विभागाकडे हरकत येऊ लागल्या आहेत. पंचायत समिती व जिल्हा परिषद तसेच महानगरपालिका या तिन्ही निवडणुकांमध्ये एकाच व्यक्तीचे चे नाव समाविष्ट कसे झाले याबाबत निवडणूक विभागातर्फे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यामार्फत बी एल ओ मार्फत चौकशी करून निवडणूक अधिकाऱ्यांकडे त्याचा अभिप्राय पाठवण्यासाठी घरोघरी भेटी देऊन नावाबाबत पडताळणी करून अभिप्राय देण्याची कार्यक्रम देखील सुरु झाले आहेत.
अनेक वर्षांपासून त्या त्या गावात वास्तव्य नसणाऱ्या अनेक स्थलांतरित मतदारांची नावे मतदार यादीत समाविष्ट झाल्याने देखील ती वगळणे बाबत नागरिकांकडून तक्रारी आल्या आहेत.
मतदार यादीत नवीन नावापासून ते मयत स्थलांतरित दुबार तसेच इतर मतदार संघातील किंवा इतर गावातील मतदारांची नावे एखाद्या मोठ्या लोकसंख्येच्या गावांमध्ये समाविष्ट झाल्याबाबत चा तक्रारीबाबत बी एल ओ मार्फत तसेच झोनल ऑफिसर च्या मदतीने पडताळणी करून प्रत्यक्ष भेटीद्वारे माहिती संकलित करून त्यावर पंचा समक्ष पंचनामे करून त्याचा अभिप्राय निवडणूक विभागाकडे पाठवुन त्याबाबत वरिष्ठ कार्यातील अधिकाऱ्यांमार्फत योग्य तो निर्णय घेण्यात येणार आहे.
पण मतदार यादीत ऑनलाइन पद्धतीमध्ये देखील काही त्रुटींचा फायदा घेत मंडळींनी नावे समाविष्ट केल्याबाबत ची कुजबुज मतदारसंघात आहे त्यांच्याबाबत कायदेशीर कारवाई बाबत निवडणूक विभाग आग्रही राहावा याबाबत नागरिकांकडून मागणी केली जात आहे. बाहेर गावच्या नागरिकांची नावे मतदार यादीत समाविष्ट करून त्यांचे मतदान करून विजय मिळवण्यासाठी धडपड करणाऱ्या मंडळींना मात्र चौकशीला सामोरे जावे लागू शकते हे मात्र आता उघड झाले आहे.