वाघोली – वाघोली हे पुणे शहराचे पुर्वेकडील मोठे उपनगर म्हणून विकसित होत आहे. याठिकाणी शेतकरी ते थेट ग्राहक आंबा महोत्सव सुरु करावा, अशी मागणी राज्य कृषी पणन मंडळ व्यवस्थापक यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रामकृष्ण सातव पाटील यांनी केली आहे.
कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक रामकृष्ण सातव पाटील यांनी सांगितले की वाघोली, खराडी व आसपासच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर नागरिकरण झालेले आहे. या भागातील नागरिकांना पुणे मार्केटयार्ड येथील मुख्य बाजारपेठेमधील शेतीविषयक माल व इतर वस्तू खरेदीसाठी येणे जाणे सोयीचे होत नाही. त्यामुळे या भागामध्ये विविध बाजारपेठा देखील विकसित होत आहेत.
या भागामध्ये ग्राहकांची संख्या प्रचंड वाढलेली आहे. त्यामुळे या भागातील ग्राहकांना अस्सल कोकणचा हापूस आंबा रास्त दरात उपलब्ध होण्यासाठी उत्पादक ते ग्राहक या संकल्पनेवर मौजे वाघोली येथील बाजारतळाचे जागेमध्ये शेतकरी ते थेट ग्राहक आंबा महोत्सव सुरू केल्यास या भागातील ग्राहकांना रास्त दरामध्ये आंबा उपलब्ध होईल व आंबा उत्पादकांना देखील त्यांच्या मालास रास्त भाव मिळेल.
तरी कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे व महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ पुणे यांचे संयुक्त विद्यमाने मौजे वाघोली, (ता. हवेली, जि. पुणे) येथील बाजारतळाचे जागेमध्ये शेतकरी ते ग्राहक आंबा महोत्सव लवकरात लवकर आयोजित करावा, अशी मागणी सातव यांनी केली आहे.