नवी दिल्ली : सध्या भारताच्या टेलिकॉम इंडस्ट्री मध्ये मोठी उलथापालथ सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे टेलिकॉम कंपन्यांकडून अधिकचे शुल्क आकारले जात आहे. काही दिवसांपूर्वीच जिओ ने कॉलिंग साठी शुल्क आकारल्यानंतर आता प्रचंड तोट्यामध्ये असलेली कंपनी व्होडाफोन- आयडियाने कोट्यवधी ग्राहकांना झटका दिला आहे.
व्होडाफोन- आयडिया या कंपनीकडून मागील कराचा भरणा थकीत असल्याने, या थकबाकीपोटी भारत सरकारने कंपनीला 4 अब्ज डॉलरचा भरणा करण्यास सांगितलेले आहे. त्यामुळे या भरण्याचा ताण आता ग्राहकांवर पडणार असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान मागील ती महिन्यांच्या अहवालानुसार कंपनीचा तोटा ५0,९२१ कोटींवर गेला आहे.
कंपनीचा तोटा भरून काढण्यासाठी येत्या 1 डिसेंबरपासून कॉलचे दर वाढविण्यात येणार आहे. याचबरोबर अन्य सेवांचेही दर वाढणार आहेत. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार Vodafone-idea ने सांगितले की, आपल्या युजरना जागतिक दर्जाच्या सुविधा सुरु ठेवण्यासाठी कंपनी येत्या 1 डिसेंबरपासून दर वाढविणार आहे. मात्र, कंपनीने किती दर वाढविणार याचा खुलासा केलेला नाही. या निर्णयाचा परिणाम कंपनीच्या तीस कोटी युजरना बसणार आहे.
2017पासून कंपनीला नफाच झालेला नाही. व्होडाफोन-आयडियाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कंपनी चालू राहणे हे आता केवळ सरकारच्या मदतीवरच अवलंबून आहे. आर्थिक मदत मिळावी यासाठी कंपनी सरकारसोबत सक्रिय चर्चाही करीत आहे. कंपनीवर 14 अब्ज डॉलरचे कर्ज आहे. जिओच्या आगमनानंतर या कंपनीला मोठा फटका बसला.