नवी दिल्ली: पश्चिम बंगालच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा राजकीय युद्ध रंगले आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ओवेसी यांचे नाव न घेता जाहीर सभेत त्यांच्यावर जोरदार हल्ला केला. तसेच त्यांच्यावर भाजपकडून पैसे घेत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. काही दिवसांपूर्वी बिहारच्या मुस्लिम बहुल भागातील एआयएमआयएमच्या उमेदवाराने विधानसभा पोटनिवडणुकीत आपला विजय नोंदविला होता. त्यामुळे ममता बॅनर्जी यांना धक्का बसला असल्याची चर्चा आहे.
दरम्यान, ममता बॅनर्जी यांच्या आरोपाला उत्तर देताना एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी म्हणाले की, “मानवी विकास निर्देशांकातील कोणत्याही अल्पसंख्याकांपेक्षा बंगालचे मुस्लिम सर्वात वाईट परिस्थितीत आहेत असे म्हणणारे धार्मिक अतिरेकी नाहीत. दीदी जर ‘हैदराबादवासीयांबद्दल दुःखी असतील तर लोकसभा निवडणुकीत पश्चिम बंगालच्या 42 पैकी 18 जागांवर भाजप कसे होते, हे त्यांनी सांगावे? असा प्रश्न ओवेसी यांनी उपस्थित केला.
ओवेसी म्हणाले की, माझ्यावर आरोप करून ममता बॅनर्जी पश्चिम बंगालच्या मुस्लिमांना राज्यात ओवेसींचा पक्ष बळकट होत असल्याचा संदेश देत आहेत. ममता बॅनर्जी अशा प्रकारच्या प्रतिक्रिया देऊन आपली भीती व निराशेची भावना दाखवत आहेत. ममता बॅनर्जी यांना पश्चिम बंगालमधील मुस्लिमांच्या वाईट सामाजिक परिस्थितीबद्दल काळजी वाटली पाहिजे. ममता बॅनर्जी यांच्यामुळे मुस्लिम निराश झाले आहेत. मुस्लिमांनी त्याला मनापासून मतदान केले आहे, हे त्यांनी विसरू नये.