पुणे -“जय जय राम कृष्ण हरी’ नामाचा गजर करत “बा विठ्ठला, संपूर्ण जगावर आलेल्या करोनारूपी संकटाचे निवारण होऊ दे आणि पुढल्या वर्षी दर्शनाचा लाभ घडू दे’, अशी प्रार्थना स्वागत सोहळ्यात केली.
“संवाद’, कृष्णकुमार गोयल फाउंडेशन आणि रामकृष्ण हरी प्रतिष्ठानच्या वतीने संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचे प्रतीकात्मक स्वागत सोहळ्याचे आयोजन केले होते. यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, डॉ. सदानंद मोरे, चैतन्य महाराज आळंदीकर, उद्योजक कृष्णकुमार गोयल, सुनील महाजन, निकिता मोघे आदी उपस्थित होते.
देहू येथून संत तुकाराम महाराज आणि आळंदी येथून संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे प्रस्थान झाल्यानंतर पुण्यात या पालख्या एकत्र येतात. मात्र, गेल्या वर्षीपासून पायी वारी सोहळा झाला नाही. त्यामुळे यंदाही पालखी सोहळ्याचे प्रतीकात्मक स्वागत ज्ञानेश्वरी आणि तुकाराम गाथेचे पूजन करून केले.
पुणे विद्यापीठ आणि महापालिकेच्या वतीने पालखी सोहळ्याचे पुण्यात स्वागत करण्याची परंपरा आहे. परंतु, यंदाही पालखी सोहळा नसल्याने आयोजित केलेला प्रतीकात्मक स्वागत सोहळा मनाला समाधान देणारा असल्याचे डॉ. करमळकर म्हणाले.
“वारीदरम्यान वारकऱ्यांची सेवा करण्याची संधी मिळते याला गेल्या वर्षीपासून मुकतो आहे,’ असे गोयल म्हणाले. प्रास्ताविक सुनील महाजन यांनी केले. आभार मंदार चिकणे यांनी मानले.