संगमनेर, (प्रतिनिधी)- आश्वी खुर्द शिवारातील सोनवणे वस्तीनजीक उभे असलेल्या दोन वाहनांतून कत्तलीसाठी वासरे नेत असल्याचा संशय आल्याने गावातील तरुणांनी वासरे वाहतूक करणारी दोन वाहने पकडून पोलिसांच्या ताब्यात दिली. यावेळी तब्बल ९ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करत आरोप विरुद्ध गुन्हा दाखल केला.
मंगळवारी सायंकाळच्या सुमारास मोठेबाबा कमानीजवळ सोनवणे वस्तीनजीक एका गाडीत कत्तलीच्या उद्देशाने वासरे घेऊन जात असल्याची माहिती तरुणांनी पोलिसांना फोन करून कळवली होती. माहिती मिळताच आश्वी पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते.
मालवाहतूक गाडीमध्ये दहा वासरे चिकटटेप तोंडाला लावलेले व पाय दोरीने बांधलेले आढळून आले. दुसऱ्या गाडीत पाच वासरे याच अवस्थेत आढळून आली. त्यामुळे फोन करणारे अमोल जाधव व त्यांच्या सहकाऱ्यांकडे पोलिसांनी अधिक चौकशी केली असता फिरोज नवाज शेख व त्याचा भाऊ अन्वर नवाब शेख (दोन्ही रा. शेडगाव, ता. संगमनेर) आणि दोन अनोळखी व्यक्ती हे वासरे गाडीत भरत होते. आम्हाला पाहून ते उसाच्या शेतात पळून गेल्याची माहिती दिली.
यानंतर पोलिसांनी १५ हजार रुपये किंमतीची १५ वासरे, ५ लाख रुपये किंमतीचे मारुती कंपनीचे मालवाहतूक वाहन (एम. एच. १७ बीवाय. ४८९३) आणि ४ लाख रुपये किंमतीचे टाटा कंपनीचे इंडीगो वाहन (एमएच. ०४. डीवाय. ७११८), असा एकूण ९ लाख १५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.
दरम्यान, पोलीस हवालदार रवींद्र वाकचौरे यांनी आश्वी पोलीस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली. आरोपी विरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण सुधारणा अधिनियम १९९५ चे कलम ५ (अ), ९, प्राण्याचा छळ प्रतिबंध अधिनियम १९६० कलम ३, ११ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.