सुहासीने आपली सगळी ताकद लावून ती जड सुटकेस कशीबशी उचलली आणि एकदाची रॅकवर ठेवली. “तू इथेच थांब.’ समीरने पाठीवरची सॅक पुढे पायाजवळ घेतली आणि खिडकीची काच उघडत,”आई, त्या काकांना सांग सायकलला दोरीने घट्ट बांधा.’ “हो रे बाबा…’ “किती झाले?’ “पन्नास रुपये.’ “हे घ्या.’ तेवढ्यात कंडक्टरने आवाज दिला. “चला, बस सुटायची वेळ झाली.’ “आई, चल लवकर.’ सुहासी बसमध्ये चढली.
“महिनाभरासाठी चाललोय आपण. काय गरज होती सायकल घ्यायची?’ सुहासी समीरवर ओरडली. “बोला. कुठं जायचंय?’ “एक फुल्ल आणि एक हाफ, केळशी.’ समीर तोंड फुगवून खिडकीबाहेर बघत होता. “अलीकडे तू खूप हट्टी होत चाललास.’ “माझ्या बाबाने दिलीय मला घेऊन. ती सोबत असली की; बाबा सुद्धा सोबत असल्यासारखा वाटतो.’ सुहासीने समीरला आपल्या छातीशी घट्ट धरलं. “सॉरी.’ क्षणात समीरच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. “बरं, मला नेशील समुद्रकिनारी तुझ्या सायकलीवरून फिरायला?’ “हो, नेईल.’ दोघे मायलेकरं एकमेकांकडे पाहून हसू लागले.
खिडकीवाटे येणारा गार वारा अंगाला झोंबत होता. वळणा वळणाच्या रस्त्याने गाडी घाटातून पुढे जात होती. हिरवागार शालू पांघरलेल्या डोंगरावर मध्येच पिवळ्याशार रानफुलांची नक्षी पाहताना सुहासी जणू परत दहा-एक वर्षाची चिमुरडी झाली. डोंगरदरीच्या कपारीतून फेसाळणाऱ्या धबधब्यांना पाहताना, आठवणींच्या डोहात तिचं मन पुन्हा डुबकी घेत होतं.
आभाळउंचीच्या गर्द सावलीत मन सुखावून जात होतं; तर कधी पानातून होणारी अनामिक सळसळ अंगावर सर्रकन काटा आणत होती. एक तप होऊन गेलं होतं आजोळी येऊन; पण आठवणींच्या जुन्या पाऊलखुणा अजून बुजल्या नव्हत्या! बुजणार तरी कशा म्हणा; कधी त्यांना धूळ खात पडूच दिलं नव्हतं! शशांकजवळ त्यांना एवढ्या वेळा उगाळून झालं होतं की; लहानपणी तो माझ्या सोबत नसतानाही त्याला मात्र माझ्याच अवतीभोवती असल्याचा भास व्हायचा जणू!
तो म्हणायचा, “सुहासी तू जेव्हा त्या वाळूच्या टेकडीवर सरसर चढून जायची आणि घसरत खाली यायची सांगतेस ना; तेव्हा असं वाटतं त्यावेळी मी तिथे असायला हवं होतं. तू पडू नये म्हणून तुझा हात धरायला.’ अचानक तिला कुणाच्यातरी हाताचा स्पर्श झाल्याचा भास झाला आणि तिने खिडकीवरचा हात झटकन मागे घेतला. ती कित्येक वर्षे मागे गेली.
तिच्या कानात कुणाचातरी आवाज घुमत होता. “नाही पडू देत मी तुला.’ उंच टेकडीवरून घरंगळत खाली येताना हृदयाची धडधड वाढत जायची. तोल जाऊन खाली पडणार तेवढ्यात शंतनू हात देऊन मला सावरायचा आणि माझ्यापासून पुन्हा दोन हात लांब होत खाली बघून लाजऱ्या नजरेनं हसायचा. काळा-सावळा रंग, काटक अंग, डोक्यावर कुरळे केस आणि निळसर डोळे. शंतनू सुहासीच्याच वर्गात शिकायला होता.
अधूनमधून तो तिच्या घरी जायचा. सुहासीच्या आजोबांना कधी माडावरचे नारळ उतरवायला मदत करी; तर कधी आडात पडलेले नारळ पोहऱ्याने वर काढून देत. संध्याकाळी वैद्य गुरुजींच्या घरी संगीत क्लासला दोघे एकत्रच जायचे. “तुला कितीदा सांगितलं आंबटचिंबट खात जाऊ नकोस. घसा बसतो आणि मग सूर लागत नाही.’ सुहासी कित्येकदा गुरुजींचे बोलणे खायची; पण शाळेतून घरी जाताना चिंचा खायचा मोह काही केल्या तिला आवरत नसायचा. चिंचेच्या फांदीला उडी मारून पकडण्याचा तिचा प्रयत्न नेहमी फसायचा.
दगडं मारून हात भरून यायचे; पण एक चिंच खाली पडेल तर नशीब! आणि मग कुठूनतरी शंतनू यायचा आणि झाडावर चढून तिला चिंचा काढून द्यायचा. अधाशासारखी आपल्या फ्रॉकच्या खिशात बचकभर चिंचा भरायची. सुहासीला भडक लाल रंगाची अबोलीची फुलं खूप आवडायची म्हणून; आजीने मागे परसात अबोलीचं झाड लावलं होतं. दररोज न चुकता ती त्या झाडाला पाणी द्यायची.
एकेदिवशी मुसळधार पावसात नारळाच्या दोन-चार झावळ्या त्या अबोलीवर पडल्या आणि झाडाने मान टाकली. कितीतरी दिवस सुहासी मुसुमुसु रडत होती. आणि एक दिवस शंतनू अबोलीचं इवलंसं रोप घेऊन आला. त्या दोघांनीच मिळून ते रोप लावलं. त्यादिवशी सुहासी खळखळून हसत होती.
तिकडे त्या अबोलीला पालवी फुटत गेली आणि इकडे या दोघांच्या मैत्रीला! किती काळजी घ्यायचा शंतनू माझी! मितभाषी आणि अगदी लाजाळूच्या झाडासारखा होता! आजी त्याला म्हणायची, “मुलीच्या जन्मी जायचंस ते चुकून मुलगा झालास!’ शंतनूविषयी कधी शशांकला सांगावसं का बरं वाटलं नाही? स्वतःच्याच मनाशी बोलत बसलेली सुहासी कंडक्टरच्या आवाजाने अचानक भानावर आली.
“चला, केळशी स्टॉप उतरून घ्या.’ दोघे बसमधून खाली उतरले. सुहासीने सुटकेस सायकलवर ठेवली. “बघ, झाली ना मदत? तुझ्या हातातलं ओझं कमी झालं.’ सुहासीने हसल्यासारखं केलं. मघाशी पडलेल्या प्रश्नानं तिच्या मनावरचं ओझं मात्र वाढलं होतं. अरुंद वाटेवरून चालताना काहीसा बदल जाणवत होता. पण आजही काही ठिकाणी चिऱ्याच्या लाल भिंतीची कौलारू घरं आणि समोर अंगणात बकुळीची पखरण नजरेस पडतच होती.
बहुतेक घरांना नारळीच्या आणि सुपारीच्या झाडांचा वेढा होता. मध्येच दाटीवाटीत वाढलेली जास्वंदी वर डोकावत होती. “आई, ते स्टेज आहे का?’ सुहासी हसून, “नाही. याला पाखाड्या म्हणतात. इथे धो-धो पाऊस पडतो. लोकांना ये जा करायला त्रास होऊ नये म्हणून या पाखाड्या तयार केल्यात.’ समीरला पडलेल्या प्रत्येक कुतुहलाला सुहासी उत्तर देत गेली. बघताबघता दोघांनी घर गाठलं.
“किती उशीर? तुझी वाट बघून जीव जायची वेळ आली.’ सुटकेस घेऊन सुहासीचा मामा आत गेला. सुहासी अंगणात उभी राहून डोळे भरून घराकडं पाहू लागली. मामीने त्या दोघांना हात-पाय धुवायला चुलीवरचं गरम पाणी दिलं. “आली का माझी सुहासी?’ आपल्या आजीचा कापरा आवाज ऐकला आणि सुहासी धावतच तिच्या कुशीत जाऊन शिरली. सुहासी ओक्साबोक्सी रडू लागली. शशांकचा आधार हरवल्यानंतर ती आतून पार तुटून गेली होती.
आजीच्या उबदार मिठीतून तिला सोडवत नव्हतं. आजीने कशीबशी तिची समजूत काढली आणि समीरला जवळ घेत त्याच्या गालावरून हात फिरवला. “अगदी शशांकवर गेलाय!’ “तू येणार म्हणून हिने तुझ्या आवडीचे खास उकडीचे मोदक आणि शेवया केल्यात. पोटात कावळे ओरडायला लागलेत. माका भूक लागली हं.’ समीर मामाच्या तोंडाकडे पाहत, “माका म्हणजे?’ मामाने समीरला उचलून घेत, “माका म्हणजे मला आणि तुका म्हणजे तुला… तुला नाही लागली भूक?’ “मामा, महिन्याभरात तुझ्या डोक्याचा पार भुगा होणार बघ. याला काय म्हणतात आणि त्याला काय म्हणतात…?’
रात्री उशिरापर्यंत सुहासी एकटीच आभाळातल्या चांदण्याकडं टक लावून बघत बसली होती. “झोप पोरी आता.’ म्हणत मामाने तिच्या डोक्यावर हात ठेवला. समीरला कुशीत घेऊन सुहासी झोपी गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी अंगणात फेऱ्या मारता मारता सुहासी मागे परसात गेली. रंगीबेरंगी फुलांवरून हात फिरवत चालणाऱ्या सुहासीची पावलं अचानक अबोलीच्या झाडापाशी थबकली. तिने मोठ्याने आवाज दिला.
“इकडे ये.’ सुहासीचा आवाज ऐकून मामा तिच्याजवळ आला. “काय झालं?’ अबोलीच्या फुलांना डोळेभरून पाहताना सुहासीच्या चेहऱ्यावर हसू उमटलं होतं. “हि अबोली, मी आणि शंतनूनेच लावली होती ना?’ “हो.’ “मला वाटलं ती कधीच सुकून गेली असेल.’ “वाट वाकडी करून यायचा तो. स्वतःच पाणी शेंदून अबोलीला द्यायचा. काहीवेळ त्या फुलांना गोंजारत बसायचा आणि काही न बोलता निघून जायचा.
गेली कित्येक वर्षे त्या अबोलीला त्याची सवय झाली होती. दोघांत काय हितगुज चालायचं कुणास ठाऊक?’ फुलं तोडता तोडता सुहासी थांबली. “कुठे असतो शंतनू?’ “गेला.’ “कुठे?’ “समुद्राच्या पोटात…’ मामाचा आवाज जड झाला होता. “त्या दिवशी जाळं टाकायला गेला आणि खवळलेल्या समुद्रात होडी पलटी होऊन… वर्ष होऊन गेलं.’ सुहासीच्या डोळ्यातून घळाघळा पाणी वाहू लागलं. थरथरत्या आवाजात तिने विचारलं. “त्याची बायको आणि मुलं?’ “लग्न नाही केलं त्याने.’ सुहासीच्या काळजाचा ठोका चुकला आणि ओंजळीतली फुलं सर्रकन खाली निसटली.
त्यादिवशी संध्याकाळी सुहासी किनाऱ्यापाशी बसली होती. अस्ताला जाणाऱ्या सूर्याची सोबत देखील काही क्षणच उरली होती. समुद्राच्या लाटा तिच्या पायाला अलगद स्पर्शून पुन्हा मागे सरायच्या. ती स्तब्ध होऊन पाहत होती. तिच्याही आत कितीतरी लाटा उसळत होत्या; पण काही प्रश्न अनुत्तरीतच होती. पाठीमागून समीरने तिला घट्ट मिठी मारली आणि सुहासी भानावर आली. अबोलीच्या फुलांची ओंजळ समुद्राच्या लाटेत रीती करताना; तिने तिच्या डोळ्यात आज पहिल्यांदाच तो “समुद्र’ भरून घेतला होता…!
अमोल भालेराव