जामखेड, (प्रतिनिधी)- लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्याकरिता 50 टक्क्यांपेक्षा कमी टक्के मतदान असलेल्या मतदान केंद्रांच्या क्षेत्रात घरोघरी भेटी देण्याचे निर्देश निवडणूक आयोगातर्फे देण्यात आलेले आहेत. यासंदर्भात आज सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी नितीन पाटील यांच्या कक्षामध्ये मतदारांना मतदानाकरिता प्रोत्साहित करण्याबाबतच्या नियोजनाची बैठक पार पडली.
बैठकीमध्ये कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघांमध्ये 50% पेक्षा कमी मतदान असलेल्या मतदान केंद्रासोबतच ज्या मतदान केंद्रावर राज्याच्या सरासरी मतदान टक्केवारीपेक्षा कमी टक्के मतदान झालेले आहे, अशा सर्व मतदान केंद्रांवर गृहभेटी देण्याचे निर्देश पाटील यांनी दिले. त्यानुसार ग्रामीण आणि शहरी स्तरावरील एकूण 128 मतदान केंद्रांवर टीम प्राधान्याने तयार करण्यात आलेल्या आहेत.
या टीममध्ये ग्रामपंचायत, नगरपालिका कर्मचारी, अंगणवाडी सेविका व मदतनीस. आरोग्यसेविका व आशा सेविका, ग्रामसेवक, पोलीस तलाठी या कर्मचाऱ्यांच्या टीम गठीत करण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार मतदारांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येणार आहे. दि. 10 व 11 मे रोजी मतदार संघातील सर्व मतदान केंद्रांमधील मतदारांच्या घरोघरी भेटी देण्याचे निर्देश पाटील यांनी दिले.
मतदानाच्या दिवशी संबंधित भागांमध्ये प्रत्यक्ष फिरून मतदान न केलेल्यांना मतदानासाठी जाण्यास प्रोत्साहित करण्याबाबत निर्देश देण्यात आले. बैठकीवेळी तहसीलदार गुरु बिराजदार, तहसीलदार गणेश माळी, गटविकास अधिकारी प्रकाश पोळ, मुख्याधिकारी अजय साळवे, महिला व बालविकास अधिकारी प्रशांत मिटकरी इत्यादी उपस्थित होते.