पुणे -गेल्या आठ महिन्यांपासून शिथिलता आल्यानंतर गावकारभाऱ्यांनी प्रथमच पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत गावपातळीपर्यंत नेटवर्क राबविले. महाविकास आघाडी आणि भाजप यांच्यातील चुरस ही गावकारभाऱ्यांना “रिजार्च’ करणारी ठरली आहे. तिन्ही गटांतील स्थानिक नेत्यांनी जिल्ह्यात एकदिलाने यंत्रणा राबविल्याने त्याचा फायदा स्थानिक पातळीवर होणार आहे. या निवडणुकीत गावागावांत जोमात असलेली भाजपा बॅकफूटवर गेली आहे. हे या निकालावरून स्पष्ट झाले आहे.
पुणे पदवीधर मतदारसंघातील महत्त्वाचा ग्रामीण भाग असलेला बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर, भोर- वेल्हे- मुळशी, शिरूर- हवेली, आंबेगाव, खेड, जुन्नर, मावळ तालुक्यात महाविकास आघाडी- भाजपामध्ये चुरस पाहावयास मिळाली. गेल्या वर्षभरापूर्वी राज्यात सत्तेत आलेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना या निवडणुकीने उभारी मिळाली होती. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर तीन महिन्यांच्या आतच करोना आणि लॉकडाऊनचा विळखा पडला होता. त्यामुळे संपूर्ण ग्रामीण जीवन ठप्प झाले होते.
त्यावेळी ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार होत्या. मात्र, लॉकडाऊनमुळे ग्रामपंचायतींच्या निवडणुका लांबणीवर पडल्या होत्या. लॉकडाऊननंतर पहिल्याच होणाऱ्या पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत मरगळ दूर होऊ लागली. महा विकास आघाडीकडून राष्ट्रवादीचे उमेदवार अरूण लाड यांच्या प्रचारासाठी स्थानिक नेते सक्रिय झाले होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांनी स्थानिक नेत्यांना रिजार्च केले. उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे तसेच राष्ट्रवादीचे आमदार अशोक पवार, अतुल बेनके यांनी कार्यकर्त्यांना सक्रिय केले. कॉंग्रेसचे आमदार संग्राम थोपटे, आमदार संजय जगताप यांनी आघाडीचा धर्म पाळला. त्यामुळे जिल्ह्यात तालुकानिहाय मतदानाचा टक्का वाढण्यास मदत मिळाली. इंदापूरमध्ये भाजपाचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी पदवीधरचे उमेदवार संग्राम देशमुख यांना चांगलीच रसद पुरविली. या तालुक्यात 13 हजार मतदारसंख्या आहे. त्यामुळे दोन्ही गटांचे उमेदवार इंदापूरवर लक्ष ठेवून होते.
पुरंदरमध्ये ऐक्यातून नेटाने प्रचार
पुरंदर तालुक्यात महा विकास आघाडीच्या तालुकापातळीवरील नेत्यांनी झाडून प्रचार यंत्रणा राबविली. त्याचा सकारात्मक परिणाम निकालातून दिसून आला. पुरंदर तालुक्यात माजी आमदार अशोक टेकवडे, जिल्हा बॅंकेचे माजी अध्यक्ष, संचालक प्रा. दिगंबर दुर्गाडे, पुरंदर राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष माणिकराव झेंडे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सुदाम इंगळे, माजी तालुकाध्यक्ष शामराव भिंताडे, जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र धुमाळ, युवकचे तालुकाध्यक्ष पुष्कराज जाधव आदी पदाधिकाऱ्यांनी नेटाने प्रचार केला.
कॉंग्रेसकडून तालुकाध्यक्ष प्रदीप पोमण, जिल्हा परिषद सदस्य दत्ता झुरंगे, पंचायत समिती सदस्या सुनीता कोलते आदी पदाधिकाऱ्यांची फळी महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी सक्रिय झाली होती. शिवसेनेतर्फे सभापती नलिनी लोळे, जिल्हा परिषद सदस्य दिलीप यादव, माजी सभापती अतुल म्हस्के, जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य रमेश इंगळे आदींनी आघाडी धर्म पाळला.
ग्रामीण भागात भाजपला मरगळ
पदवीधरच्या निवडणुकीत जिल्ह्यात भाजपचे एकच आमदार ऍड. राहुल कुल आहेत. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचेही इंदापूरमध्ये प्राबल्य आहे. या दोन नेत्यांचा अपवाद वगळता जिल्ह्यात भाजपाचे संघटन आता कमकुवत होत आहे. इतर तालुक्यांत राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसचे वर्चस्व आहे. त्यामुळे आगामी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीपूर्वी भाजपामध्ये मरगळ आल्याचे दिसत आहे. आमदारकीचा पाया ग्रामीण भाग असल्याने तो राष्ट्रवादीने मजबूत केला आहे. यात कॉंग्रेस, शिवसेनेने मशागत केली. आगामी निवडणुकीत तिन्ही पक्ष एकत्रित येतील किंवा स्वतंत्र लढतील, हे स्पष्ट नसले तरी महाविकास आघाडीतील घटक पक्षांना पोषक वातावरण मिळाले आहे.
तरूण मतदारांशी नाळ जोडली
पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत गावातील तरूण मतदार हा महत्त्वाचा घटक होता. हा मतदार आगामी ग्रामपंचायतीला आपल्या गटासाठी उपयोगी पडेल, यासाठी आतापासूनच कनेक्टीव्हिटी केली आहे. संपर्क, संवादातून हा मतदार ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत टक्का वाढविणार आहे. ही निवडणूक रंगीत तालीम ठरली असली तरी ग्रामपंचायतींसाठी मोर्चेबांधणी, व्यूहरचना करणारी ठरली आहे.