नवी दिल्ली- ओबीसी, एससी- एसटी आरक्षणाचा काही भाग मुसलमानांना द्यायचा अशी कॉंग्रेसची इच्छा असल्याचा दावा भारतीय जनता पार्टीकडून केला जातो आहे. तर भाजप निवडणुकीच्या काळात अल्पसंख्यकांना म्हणजे मुसलमानांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न करतो आहे असा आरोप कॉंग्रेसने केला आहे. त्यामुळे निवडणुकीत धर्माच्या नावावर आरक्षण हा विषय आता ऐरणीवर आला आहे.
धर्म हे आरक्षण प्रदान करण्याचे कारण आणि अधिकार होऊ शकत नाही. ते देशाच्या संविधानाच्या विरोधात आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले मुसलमानांना आरक्षण मिळणार नाही असे मी कधीही म्हटले नाही. मी केवळ एवढेच म्हणतो आहे की धर्माच्या आधारावर आरक्षण द्यायला नको.
देशातील गरिबांमध्ये सगळ्यांचाच हिंदु, ख्रिश्चन, पारशी यांचाही समावेश आहे. त्या सगळ्यांना आरक्षणाचा लाभ मिळाला पाहिजे. दलित आणि आदिवासींना हजारो वर्ष अन्यायाचा सामना करावा लागला आहे. आपल्या देशाच्या घटनाकारांनी योग्य निर्णय घेतला होता आणि आपण सगळ्यांनी त्यांचे आभारी असले पाहिजे.
कोणताही राजकीय पक्ष संविधानाचा विरोध करत नाही. जेंव्हा घटना लिहिली जात होती तेंव्हा पंडित नेहरू, बाबासाहेब आंबेडकर, राजेंद्र प्रसाद आदी नेते तेथे होते. भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे लोक तेंव्हा नव्हते. त्यावेळीही प्रदीर्घ चर्चेनंतर असा निर्णय घेतला गेला होता की धर्माच्या आधारावर आरक्षण हे समाजासाठी घातक असेल.
सरकारी योजनांमध्ये सगळ्यांना समान अधिकार आणि न्याय मिळाला पाहिजे. हीच सामाजिक न्यायाची गॅरंटी असल्याचे त्यांनी म्हटले आहे. मात्र कॉंग्रेस मोदींच्या या विधानांकडे धृवीकरणाचा एक प्रयत्न म्हणून पाहतो आहे. त्यामुळे मोदी मुसलमानांना लक्ष्य करत असल्याचा आरोप कॉंग्रेसने केला आहे. कॉंग्रेसच्या सहकारी पक्षांनीही हीच भूमिका मांडली आहे. त्यामुळे निवडणुकीच्या उर्वरित टप्प्यांत हाच विषय प्रभावी ठरतो का हे पाहावे लागणार आहे.