भिगवण -एक शेतकरी प्रकल्पात जमीन गेल्याने शासनाच्या नियमानुसार महसूल विभागाकडून बदली जामीन मिळवतो. मिळालेली जमीन कसत असताना त्याच्या आयुष्यात पुढे जातो. आता त्याची मुले व नातवंडे ती जमीन कसतात. त्या जमिनीमध्ये विहीर खोदतात, फळबाग लावतात, उसाची शेती करतात, भुईमूग कडवळ यासारखी पीके घेतात. हे वर्षानुवर्षे चाललेले असते.
अचानक एक दिवस वनविभागास जाग येते. अगदी दिवस उगवता येऊन सोळा जेसीबी मशीन व शे-दोनशे माणसांच्या साह्याने सर्व शेतजमीनीवरील पीके, घरे-दारे उध्वस्त केली जातात. ही चित्रपटाची कथा नाही तर पिंपळे (ता. इंदापूर) येथे सुनील साहेबराव बागल या शेतकऱ्याबाबत घडलेली वास्तव व्यथा आहे.
आपली व्यवस्था दुर्दैवी आहे. काहीच किंमत नसल्यामुळे या व्यवस्थेचा पहिला बळी ठरतो तो म्हणजे शेतकरी. शेतकऱ्याचे नाव सातबारा उताऱ्यावर आहे. 1971 साली तलावात जमीन गेली म्हणून बदली जमीन मूळ जमिनीएवढीच एकूण 14 एकर 20 गुंठे या शेतकऱ्यास वितरीत केली. जमिनीच्या कागदपत्रांची पुर्तता करण्यास 1983 साल यावे लागले.
आता 1980 सालच्या नंतर जमीनीचा आदेश प्रांताधिकाऱ्यांकडून दिला गेला. या कारणास्तव वन विभाग यास अतिक्रमण मानतो आहे. त्याला विविध कार्यकारी संस्थेने पीक कर्ज दिले आहे. कर्जाची रक्कम 15 लाख आहे. पोंधवडी (ता. इंदापूर) येथे तलावात जमीन गेल्याने त्या कुटुंबास बदली जमीन म्हणून हे क्षेत्र मिळाले होते.
महसूल, वन विभागाच्या नोंदींमध्ये तफावत असेल तर संबंधित विभागाने अगोदर परस्पर समन्वयातून योग्य तो निर्णय घ्यायला हवा, मगच कारवाई करायला हवी होती. अशी कार्यवाही करण्याअगोदर संबंधित शेतकऱ्याला लेखी सूचना देणे आवश्यक आहे. या शेतकऱ्याचे 35 ते 40 लाखांचे नुकसान झाले आहे.
नेमका उद्देश काय?
वनविभाग या शेतकऱ्याला संबंधित क्षेत्रात येण्यास प्रतिबंध करु शकले असते. ज्या पद्धतीने नुकसान करण्यात आले, ते पाहता नेमका उद्देश काय? असा प्रश्न शेतकरी वर्गातून विचारला जात आहे. शेतातील विहीर माती टाकून बुजविण्यात आली. डाळिंबाची झाडे मशिनच्या साह्याने जमिनदोस्त करण्यात आली. या शेतकऱ्यांची हाताशी आलेली डाळिंब, ऊस, भुईमूग, पडवळ पिकांचे लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे.
इंदापूर तालुक्यात वन क्षेत्रातील अतिक्रमण कारवाई नियमानुसार करण्यात आली आहे. वन अधिनियम 1927 व 1980 नुसार हे वनक्षेत्र राखीव आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारचे अतिक्रमण करण्यास मनाई आहे. तसेच ही कारवाई प्रशासकीय कामकाजाचा भाग आहे.
– राहुल काळे, वन अधिकारी, इंदापूर.