पुणे – विधानपरिषदेसाठी पुण्याला संधी मिळणार की नाही, हे गुलदस्त्यात असताना राज्यपाल नियुक्त जागांसाठी पुण्यात चढाओढ सुरू झाली आहे. इच्छुकांची संख्या एवढी आहे, की प्रत्येकाने वेगवेगळ्या मार्गाने आपली निष्ठा पणाला लावली आहे. त्यातील एका इच्छुकाने तर थेट पक्षाचे नेते राहुल गांधी यांनाच पत्र लिहिले आहे.
राज्यपाल नियुक्त 12 आमदारांचा कार्यकाल संपल्याने लवकरच नवीन आमदारांची नियुक्ती होणार आहे. महाविकास आघाडीतीलच शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसच्याच सदस्यांना ही संधी मिळणार हे निश्चित आहे. कॉंग्रेसला मिळणाऱ्या जागेवर संधी मिळावी, यासाठी आजी-माजी आमदार आणि पदाधिकाऱ्यांनी मोर्चेबांधणी केली आहे. राज्य आणि केंद्रातील आपापल्या नेत्यांना निष्ठा दाखवत साकडेही घातले आहे.
एका सदस्याने थेट राहुल गांधींनाच पत्र पाठवले आहे. त्यामध्ये “आधी ज्यांना संधी मिळाली आहे त्यांना पुन्हा संधी देऊ नये. आपण पक्षात विविध भूमिकांमध्ये काम केले असून, क्रीडा क्षेत्राचाही 30 वर्षांचा अनुभव आहे. तसेच आपण राज्यपाल नियुक्त सदस्यत्वाच्या निकषांमध्ये बसतो,’ असे या पत्रात म्हटले आहे.