माधव विद्वांस
समाजसुधारणाविषयक शतपत्रे लिहिणारे रावबहादूर गोपाळ हरी देशमुख ऊर्फ लोकहितवादी यांचे आज पुण्यस्मरण. त्यांचा जन्म 18 फेब्रुवारी 1823 रोजी पुणे येथे झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण पुणे येथेच पार पडले. त्यांनी न्यायमूर्ती रानडे, विष्णुशास्त्री चिपळूणकर यांच्या सहकार्याने बुधवारवाडा येथे पुण्यात पूना नेटिव्ह जनरल लायब्ररी या नावाने 7 फेब्रुवारी 1848 रोजी ग्रंथालयाची स्थापना केली.
कालांतराने या ग्रंथालयाचे नाव पुणे नगरवाचन मंदिर झाले. 13 मे 1879 रोजी बुधवारवाडा आगीत भस्मसात झाला. त्यानंतर दहा वर्षे ग्रंथालय पुणे सार्वजनिक सभेच्या जागेत होते. 15 मे 1882 रोजी वाचनालयासाठी सध्याची लक्ष्मीपथावरील बेलबागे समोरील जागा खरेदी करण्यात आली. सुरुवातीस इंग्रजी राजवट सुरू झाल्यावर ज्या काही मंडळींनी शिक्षण घेतले व शासन दरबारी व समाजात प्रतिष्ठा मिळविली त्यापैकी लोकहितवादींचे नाव प्रामुख्याने घ्यावे लागते.
1846 मध्ये ते तत्कालीन मुन्सफ या न्यायाधीश समकक्ष पदाची परीक्षा पास झाले. वर्ष 1851 मध्ये ते वाई येथे न्यायाधीश झाले. वर्ष 1856 मध्ये त्यांची नेमणूक सहाय्यक आयुक्त म्हणून झाली. वर्ष 1857 ते 1861 या कालावधीत ते आयुक्त या पदावर होते. त्यानंतर वर्ष 1862 मध्ये त्यांची नेमणूक सहाय्यक न्यायाधीश (मुंबई सरकार) म्हणून झाली व वर्ष 1879 मध्ये त्याच पदावरून निवृत्त झाले.
वर्ष 1867 मध्ये अहमदाबाद येथे स्मॉलकॉज कोर्टात जज्ज म्हणून नियुक्ती झाली. वर्ष 1878 मध्ये ते मुंबई विद्यापीठाचे फेलो झाले. वर्ष 1877 मधे ब्रिटिश सरकारने त्यांना लॉर्ड लिटन यांच्या हस्ते दिल्ली दरबारात तत्कालीन मानाची रावबहादूर ही पदवी दिली. त्यांनी भाऊ महाजन यांच्या “प्रभाकर’ या साप्ताहिकातून वर्ष 1848 मध्ये शतपत्रे लिहिण्यास सुरुवात केली, त्यातून त्यांनी ऐतिहासिक-धार्मिक-राजकीय व सामाजिक माहिती दिली.
त्यांनी वर्ष 1842 मध्ये वयाच्या एकोणिसाव्या वर्षी “हिंदुस्थानचा इतिहास’ हे पुस्तक लिहिले. मात्र पुस्तकाचे प्रकाशन वर्ष 1878 मध्ये झाले. वर्ष 1848 पासून त्यांनी प्रभाकर या साप्ताहिकात, लोकहितवादी या नावाने प्रबोधनपर लेखन केले. हे त्यांचे कार्य दीपस्तंभ ठरले. शतपत्रांचा इत्यर्थ मथळ्याच्या पत्रात त्यांनी सुधारक विचारांच्या लेखनाचा हेतू स्पष्ट केला आहे. मूळ संख्येने 100 असलेल्या या निबंधमालिकेत त्यांनी संस्कृतविद्या, पुनर्विवाह, पंडितांची योग्यता, खरा धर्म करण्याची आवश्यकता, आदी सुधारणा हे विषयही समाविष्ट केले आहेत.
लोकहितवादींनी आपल्या लेखनात समाजहिताला प्राधान्य दिले व त्याअनुषंगाने प्रबोधनपर लेख लिहिले. त्यांनी बालविवाह, हुंडा, बहुपत्नीत्वाची पद्धती, अशा अनिष्ट प्रथांवर टीका केली. स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीने अधिकार मिळाले पाहिजेत, तसेच त्यांना शिक्षण व विवाह याबाबत मतस्वातंत्र्य असावे, विधवांना पुनर्विवाह करण्याचा अधिकार असावा, असे विचार त्यांनी स्पष्टपणे मांडले होते. जातीसंस्था हा देशाच्या उन्नती होण्याच्या मार्गातील मोठा अडसर आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.
लोकहितवादी हे एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धातील, पिढीतील हिंदुस्थानातील अर्थशास्त्रज्ञ होते. तसेच अर्थशास्त्रावर मराठीतून लेखन करणारेही ते पहिलेच लेखक ठरले. “लक्ष्मीज्ञान’ या ग्रंथाद्वारे त्यांनी ऍडम स्मिथप्रणीत अर्थशास्त्र वाचकांसमोर आणले. मातृभाषेतून शिक्षण या तत्त्वाचा त्यांनी प्रसार केला. त्यांचे निधन 9 ऑक्टोबर 1892 रोजी झाले.