Sharad Pawar | 7 important demands | state government | water – राज्याच्या अनेक भागात विशेषत: मराठवाड्यात भीषण पाणी टंचाई आणि दुष्काळी स्थिती आहे. त्या संबंधात राज्य सरकारने तातडीने काही उपाययोजना हाती घेतली पाहिजे अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शरद पवार गटाचे प्रमुख शरद पवार यांनी आज येथील पत्रकार परिषदेत केली.
त्यांनी पाणी टंचाईने ग्रस्त असलेले जिल्हे आणि गावे तसेच तेथील सध्याच्या टँकरची स्थिती आदि बाबींवर विस्तृत भाष्य करताना राज्य सरकारकडे सात प्रमुख मागण्या केल्या आहेत.
जुलैच्या अखेरीपर्यंत पाण्याची टंचाई कायमच राहणार आहे. त्यामुळे मराठवाडा आणि अन्य ठिकाणी तातडीने पाण्याचे वाढीव टँकर पुरवले जावेत. राज्यातील शेतकऱ्यांनी पिक विमा काढला आहे,
पण त्यांचे पैसे देण्यास विमा कंपन्याटाळाटाळ करीत आहेत, त्यामुळे राज्य सरकारने त्यांच्याशी बोलून शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाईचा विषय त्वरीत मार्गी लावला पाहिजे. टंचाईग्रस्त भागात वीज बिलांत सवलत द्यावी, वीज वसुली थांबवावी अशी मागणीही त्यांनी केली आहे.
वीज बिल भरले नाही म्हणून वीज तोडण्याची कारवाई त्वरीत थांबवावी. मनरेगाच्या कामांच्या निकषात शिथीलता आणावी व राज्यात पुर्वी रोजगार हमी योजनेचे जे निकष हेाते तेच निकष पुन्हा लागू करावेत, दुष्काळग्रस्त भागातील मुलांची शालेय फी माफ करावी,
फळबागांचे नुकसान झाल्यानंतर राज्यात नुकसान भरपाई देण्याची पद्धत होती, ती पद्धत पुन्हा लागू करावी, जिथे गंभीर पाणी टंचाई आहे, त्या भागात जनावरांसाठी चारा छावण्या सुरू कराव्यात अशा सात मागण्या त्यांनी राज्य सरकारकडे केल्या असून त्या बाबत तातडीने निर्णय घेण्याची मागणीही त्यांनी केली आहे.