भारतात एआय टीचरचा प्रयोग सुरू आहे. हा प्रयोग यशस्वी झाला तर पुढील काळात शिक्षणक्षेत्रासंबंधित सर्वांनाच अपडेट राहावे लागेल. हा प्रयोग म्हणजे शिक्षणातील बदलाचे वारे असल्यासारखेच आहे.
जगामध्ये तंत्रज्ञानाच्या विकासाचा बोलबाला चालू असतानाच भारत हा अद्यापही शेतीप्रधान देश म्हणून ओळखला जातो. मात्र या देशातसुद्धा गुणवत्तेला कमी नाही हे दाखवून देण्याचं काम तंत्रज्ञानाच्या माध्यमातून होत आहे. त्यामध्ये अलीकडच्या काळात जे रोबोटच्या माध्यमातून हाउसकीपिंग ते मोठ मोठ्या उद्योग क्षेत्रात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर होत आहे. शिक्षण क्षेत्रामध्ये क्रांती घडवून आणण्यासाठी आणि हाडामासाचा टीचर ज्या पद्धतीने अध्यापनाचे काम करतो, पण एका ठराविक काळापुरतं तो करत असतो. परंतु एआय टीचरच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रामधलं अध्यापनाचं काम न थकता न तक्रार करता अत्यंत अचूकपणे करण्याचं काम होत आहे.
भारतामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रात नवनवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून विकासाकडे वाटचाल करत असताना महत्त्वाच्या शिक्षण क्षेत्रात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा शिरकाव झालेला दिसून येत आहे. हा शिरकाव झाल्यामुळे शिक्षण क्षेत्रात काम करणार्या प्रत्येकाने स्वतःला अपडेट करणे गरजेचे आहे. जर भविष्यात स्वतःला अपडेट केले नाही तर आपली जागा एआय टीचर घेऊ शकते यात तिळमात्र शंका नाही. वाढती लोकसंख्या भारतासमोर असणार्या विविध समस्या अर्थात बेरोजगारी, गरिबी त्याचबरोबर अलीकडच्या कालावधीमध्ये पर्यावरणाचा होत असलेला असमतोल यामुळे पुन्हा काही वेगळ्या समस्या देशासमोर उभ्या राहू शकतात. या सर्व बाबींचा विचार केला असता शिक्षण क्षेत्रामध्ये आलेली मरगळ बाजूला करण्यासाठी भारत सरकारच्या वतीने एआय टीचरचा पुरेपूर उपयोग केला जाईल असं चित्र दिसत आहे.
केरळमधील तिरुअनंतपुरम या ठिकाणी एका हायर सेकंडरी स्कूल मध्ये एआय टीचरचा प्रयोग केला जात आहे आणि हा प्रयोग करत असताना या एआय टीचरच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अध्यापन केले जाते. विद्यार्थ्यांना संकल्पना समजून सांगितल्या जातात. विद्यार्थ्यांना प्रश्न विचारले जातात. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे एआय टीचर अत्यंत अचूकपणे देते. विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधते. स्वतः एखादे साहित्य उचलून त्याविषयी सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना देते. त्याचबरोबर या एआय टीचरला चार पाय आहेत आणि त्या चार पायाला व्हिल्स असल्यामुळे संबंधित एआय टीचर संपूर्ण वर्गामध्ये ज्या ठिकाणी जायचे आहे त्या ठिकाणी जाऊ शकते. त्याचबरोबर संबंधित एआय टीचर ही जवळजवळ वीस भाषा बोलते आणि त्या राज्यातील भाषेनुसार त्या एआय टीचरला डेव्हलप करण्याचा प्रयत्न केला जात आहे. या एआय टीचरचा बंगळुरू आणि आयआयटी मुंबई या ठिकाणीही अध्यापनाच्या कामासाठी प्रायोगिक तत्त्वावर प्रयोग केला जात आहे. जर हा प्रयोग अत्यंत उत्तमरित्या यशस्वी झाला, तर भविष्यात शिक्षण क्षेत्रामध्ये हाडामासाच्या टीचर ऐवजी त्या ठिकाणी स्मार्ट क्लासरूमच्या माध्यमातून आणि या एआय टीचरच्या माध्यमातून अध्ययन अध्यापनाची प्रक्रिया पूर्ण करण्याचा प्रयत्न प्रशासनाच्या वतीने केला जाऊ शकतो.
सध्या ज्या पद्धतीने शिक्षण क्षेत्रामध्ये कामकाज चालते आहे त्याचा जर विचार केला तर राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 1986 यामध्ये संगणक शिक्षण अर्थात तंत्रज्ञानाच्या शिक्षणाला वाव दिलेला होता. भारतामध्ये तंत्रज्ञान विकसित व्हावं ही भूमिका त्यावेळी तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी मांडली होती आणि त्यांचं स्वप्न आज वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स रोबोटच्या माध्यमातून यशस्वी होताना दिसून येत आहे. पारंपरिक वेगवेगळ्या शिक्षण आयोगाने मांडलेल्या शिफारशीनुसार त्या त्या वेळी शिक्षणक्षेत्रामध्ये बदल घडवून आणण्याचा प्रयत्न केला गेला. त्यामध्ये कोठारी आयोग, राधाकृष्ण आयोग, स्वातंत्र्यापूर्वी हंटर कमिशन आणि अलीकडच्या काळातील राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 त्यानुसार शिक्षण क्षेत्रामध्ये क्रांती घडवून आणण्याचे काम भारत सरकार करत आहे. या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020च्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रामध्ये दिले जाणारे पारंपरिक शिक्षण कुठेतरी बाजूला करून उद्योग व्यवसायाचे शिक्षण, हाताला काम देणारे शिक्षण, माणसाला माणूस म्हणून जगवणारे शिक्षण देण्याचा प्रयत्न केला गेला पाहिजे.
भविष्यात नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण राबवत असताना येणार्या प्रत्येक अडचणीचा मागोवा घेऊन शासन स्तरावर त्याचा सकारात्मक दृष्टिकोनातून विचार होऊन त्या समस्या सोडविण्यासाठी लागणारा निधी, मनुष्यबळ, शैक्षणिक सुविधा, भौतिक सुविधा यासाठी देशपातळीवर अर्थसंकल्पामध्ये विशेष तरतूद केली गेली पाहिजे. ज्या देशांमध्ये शिक्षण क्षेत्रावर जास्त खर्च केला जातो तो देश प्रगत म्हणून ओळखला जातो. आज आपण कित्येक वर्षांपासून प्रगतशील देश म्हणून वावरत आहोत. परंतु हे आपणाला बदलून प्रगत देशाच्या यादीमध्ये जायचं असेल तर शिक्षण, आरोग्य आणि मूलभूत सुविधा या तीन बाबींवर प्राधान्याने लक्ष दिल्यास भारताचा विकास झपाट्याने होईल.
वेगवेगळ्या क्षेत्रात माहिती तंत्रज्ञान, नॅनो टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून अत्यंत झपाट्याने बदल घडत आहेत. त्या बदलाला सामोरे जाण्यासाठी शिक्षण क्षेत्राला बळकटी दिली पाहिजे. या भूमिकेनुसार प्रत्येकाने स्वतःला अपडेट करून कोणत्याही प्रकारे अचूक ज्ञानप्राप्ती केली पाहिजे.