– मिलिंद मानकर
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या उपस्थितीत भारतात पहिली सार्वजनिक बुद्धजयंती साजरी करण्यात आली. बुद्धांच्या 2500व्या जयंतीला भारत सरकारची स्वर्णिम किनार लाभली. बुद्धांचा जन्म, बोधीप्राप्ती आणि महापरिनिर्वाण या तीन महत्त्वपूर्ण घटना पावन वैशाख पौर्णिमेला घडल्या. आज, 23 मे 2024 रोजी बुद्ध जयंती त्यानिमित्ताने…
जगाला प्रकाश देणारा तेजस्वी सूर्य महाकारुणिक तथागत बुद्धांचा जन्म नेपाळच्या तराईत वसलेल्या निसर्गरम्य लुंबिनी वनात ख्रिस्त पूर्व 563 साली आई महामाया, वडील राजा शुद्धोधन यांच्या पोटी झाला. बिहार प्रांतात फल्गु नदीच्या तीरावर वसलेल्या गया येथे सिद्धार्थ गौतमाला सम्यक सम्बोधी प्राप्ती झाली आणि ते ‘बुद्ध’ म्हणून ओळखले जाऊ लागले. उत्तर प्रदेशात कुशीनगरला ख्रिस्त पूर्व 483 साली शालवृक्षाच्या शीतल छायेखाली महापरिनिर्वाणाला प्राप्त झाले. अशा या तीन महत्त्वपूर्ण घटना बुद्धांच्या जीवनात पावन वैशाख पौर्णिमेला घडल्या त्यामुळे बौद्ध जगतात बुद्ध जयंतीचा मंगलसोहळा ‘त्रिविध बुद्ध पौर्णिमा’ म्हणून जगभर मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली भारतात पहिली सार्वजनिक बुद्ध जयंती 2 मे 1950 रोजी नवी दिल्लीत साजरी झाली.
या नेत्रदीपक समारंभाला अनेक देशांचे प्रतिनिधी, भिक्खूसंघ आणि सुमारे वीस हजार लोक उपस्थित होते. तत्पूर्वी बाबासाहेबांचे धम्मगुरू ब्रह्मदेशाचे महास्थवीर चंद्रमणी यांनी 1924 साली कुशीनगरला बुद्ध जयंती साजरी केल्याचा उल्लेख सापडतो. त्याचप्रमाणे अजमेर राजस्थानला 1935 पासून बुद्ध जयंती साजरी करण्याची परंपरा सुरू झाल्याचे सांगण्यात येते. 1956 पर्यंत बाबासाहेबांच्या अध्यक्षतेखाली, प्रमुख उपस्थितीत बुद्ध जयंतीचे भव्य कार्यक्रम पार पडले म्हणून त्यांना भारतातील सार्वजनिक बुद्ध जयंती महोत्सवाचे प्रवर्तक म्हटले जाते.
1907 साली भीमरावाने मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण केली तेव्हा त्यांचा जाहीर सत्कार थोर समाजसुधारक रावबहादूर सी. के. बोले यांच्या अध्यक्षतेखाली साजरा करण्यात आला. त्यावेळी गुरुवर्य कृष्णाजी अर्जून केळुस्कर गुरुजींनी स्वतः लिहिलेले ‘बुद्धचरित्र’ भीमरावाला सप्रेम भेट दिले. हेच ‘बुद्धचरित्र’ पुढे भीमरावाचे प्रेरणास्रोत ठरले. मे 1941 साली आंबेडकरांनी जनता पत्रकात ‘बुद्ध जयंती आणि त्याचे राजकीय महत्त्व’ या विषयावर लेख लिहिला. लेखात बाबासाहेब म्हणतात, ‘बुद्धाच्या जीवनाचे आणि ध्येयाचे महत्त्व सांगण्याची आम्ही योजना आखली आहे. बुद्ध जयंती साजरी करणे हे राजकीयदृष्ट्या महत्त्वाचे आहे. 1950 साली कोलकाता येथून प्रकाशित होणार्या ‘महाबोधी’ मासिकाच्या बुद्ध जयंती विशेषांकात ‘बुद्ध आणि त्याचा धम्माचे भवितव्य’ नावाचा लेख लिहिला.
बाबासाहेबांच्या उपस्थितीत 20 मे 1951 रोजी भारतीय महाबोधी सोसायटी नवी दिल्लीच्या विद्यमाने बुद्ध जयंती साजरी करण्यात आली. अध्यक्षस्थानी फ्रान्सचे भारतातील वकील ने. ना. ह्युगो होते. बाबासाहेबांची बुद्धधम्मावर असलेली श्रद्धा पाहून अजमेरचे विपश्यनाचार्य राहुल सुमन छाबरा यांनी बाबासाहेबांची नवी दिल्ली येथील निवासस्थानी भेट घेतली. अजमेरला 21 मे 1951 रोजी साजर्या होणार्या बुद्ध जयंतीचे आमंत्रण दिले. या संदर्भात उभयतात पत्रव्यवहार झाला होता.
दिल्लीशिवाय महाराष्ट्रातही बुद्ध जयंतीला 1953 पासून सुरुवात झाली. इतर सर्व धर्मसंस्थापकांच्या जन्मदिनी देशात सुट्टी मिळते मग करुणा आणि शांतीचा महान संदेश देणार्या बुद्धांच्या जयंतीस सुट्टी का नाही? ‘एक तर नियोजित सुट्ट्यातील एक सुट्टी कमी करा अथवा एक सुट्टी वाढवून आम्हाला द्या’ अशी आग्रही मागणी बाबासाहेबांनी तत्कालीन गृहमंत्री मॅक्सवेल यांच्याकडे 1942 साली केली होती. त्यांच्याच प्रयत्नामुळे केंद्र सरकारने 27 मे 1953 रोजी बुद्ध जयंतीनिमित्त सार्वजनिक सुट्टी जाहीर केली. सामुदायिक प्रार्थना कशी म्हणावी याचे प्रात्यक्षिक करून बाबासाहेब आपल्या भाषणात म्हणाले, ‘मी माझ्या आयुष्याचे शेवटचे दिवस आता बौद्धधम्माच्या प्रसारातच खर्च करण्याचा निर्धार केला आहे. हे बौद्धधम्म प्रसाराचे शेत पेरणार आहे आणि त्यात कोणते पीक येते ते पाहणार आहे. 1954 साली रंगून ब्रह्मदेशात भरलेल्या आंतरराष्ट्रीय बुद्ध जयंती महोत्सवातही त्यांचा सहभाग होता.
बाबासाहेबांनी 6 मे 1955 रोजी वसईतील सोपारा येथील बौद्ध स्तूपाला भेट दिली. बौद्धधम्मात सोपारा (शूर्पारक) यास विशेष महत्त्व आहे. बुद्धांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीत बाबासाहेबांनी आपला एक दिवस घालविला. अगदी मोजक्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत वैशाख पौर्णिमा साजरी केली. आम्रवृक्षाखाली चौथर्यावर बसून धम्माबाबत आपले विचार व्यक्त केले. 24 मे 1956 रोजी बाबासाहेबांनी शेवटची बुद्ध जयंती मुंबईत नरेपार्क येथे साजरी केली. तसेच जीवनातील अखेरचे भाषण सारनाथला 25 नोव्हेंबर 1956 रोजी केले. सारनाथला तथागत बुद्धांनी पंचवग्गीय भिक्खूंना पहिला उपदेश करून धम्मचक्र प्रवर्तन केले होते.
बाबासाहेबांनी सुरू केलेल्या सार्वजनिक बुद्ध जयंती महोत्सवाला भारत सरकारची स्वर्णिम किनार लाभली. 24 मे 1956 रोजी बुद्धांची 2500वी जयंती भारत सरकारने राष्ट्रीय स्तरावर मोठ्या उत्साहाने साजरी केली. प्रमुख बौद्ध तीर्थस्थळांच्या स्टेशनाला बौद्ध कलाकृतीने, पंचशील ध्वजाने सुशोभित करण्यात आले होते. प्रत्येक भारतीय नागरिकाच्या कानात ‘बुद्धं सरणं गच्छामि…’चा मंजुळ स्वर गुंजारव करीत होता. त्यामुळे सारे वातावरण बुद्धमय झाल्यासारखे भासत होते. अखिल बौद्ध जगताचे लक्ष भारताकडे आकर्षित करण्यासाठी भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी वैशाख पौर्णिमेचे नाव बदलवून ‘बुद्ध पौर्णिमा’ असे ठेवले. नवी दिल्लीत आंतरराष्ट्रीय बौद्ध संमेलनाचे आयोजन केले.
दिल्लीतच ऐतिहासिक ‘बुद्ध जयंती पार्क’ उभारला. बोधीवृक्ष आणि कुशाणकालीन बोधिसत्त्वाचे छायाचित्र डाक तिकिटाच्या रूपात प्रसिद्ध केले. बिमल रॉय व दिग्दर्शक राजहंस खन्ना यांच्या मदतीने भारत सरकारच्या चित्रपट शाखेने ‘गौतम बुद्ध’ नावाचा माहितीपट तयार करून बुद्धांची शिकवण घरोघरी पोहोचविली. कालांतराने या चित्रपटाला राष्ट्रपतीचे सुवर्णपदक मिळाले. सारनाथच्या मृगदायवनात 100 हरिणे सोडण्यात आली. र्इीववहळीीं डर्लीर्श्रिींीीशी अपव चेर्पीाशपींी चित्रावली पुस्तकरूपाने प्रसिद्ध केली. दुसरीकडे उत्तर प्रदेश सरकारने भगवती शरण सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली 134 पानांची ‘बुद्ध जयंती चित्रावली’ प्रसिद्ध केली.
भारत सरकारच्या या स्तुत्य उपक्रमाने प्रभावित होऊन बौद्ध विद्वानांनीसुद्धा खारीचा वाटा उचलला. तहान-भूकेची तमा न बाळगता, अहोरात्र खपून 1956 साली बौद्ध साहित्याचे प्रकाशन केले. त्यात महापंडित राहुल सांकृत्यायन यांचा ‘महामानव बुद्ध’, धर्मानंद कोसंबी यांचा ‘भगवान बुद्ध’, राजकीय संग्रहालय उत्तरप्रदेशचे संचालक मदनमोहन नागर यांचा ‘बौद्ध महातीर्थ’, आचार्य नरेंद्रदेव यांचा ‘बौद्धधर्म दर्शन’ आणि मध्यप्रदेश शासन साहित्य परिषद नागपूरतर्फे प्रकाशित झालेला जगदीश चंद्र यांचा ‘कला के प्राण’ इत्यादी ग्रंथ प्रमुख आहेत. तसेच बाबासाहेबांनी ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ हा ग्रंथ 1950 सालापासून लिहिण्यास सुरुवात केला होता.
बौद्धांचे बायबल समजला जाणारा हा ग्रंथ त्यांच्या मृत्यूपश्चात प्रसिद्ध झाला. ग्रंथालयात शोभून दिसावे असेच हे ग्रंथ आहेत. बौद्ध साहित्याचे प्रत्येक पान वाचकांशी जणू संवाद साधतात, वाचकांना वैभवशाली बौद्ध युगात घेऊन जातात. जगातील अनेक देशांत बुद्धपौर्णिमा ‘वेसाक बुद्ध महोत्सव’ म्हणून साजरा केला जातो. ‘तुझाच गौतमा पडे प्रकाश अंतरी, तुझेच धम्मचक्र फिरे या जगावरी…’ या कवी सुरेश भटांनी लिहून ठेवलेल्या गीताच्या ओळीने बुद्धाचे धम्मचक्र अविरत फिरत आहे. (बुद्धाब्द 2568)व्या पावन वैशाख पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.