काळा पैसा बाहेर काढण्यासाठी चलन बदलचा उपाय ज्योतिर्मोय बासू यांची सूचना
मुंबई, ता. 8 – देशातील 15000 कोटी रुपयांचा काळा पैसा बाहेर काढण्यासाठी सरकारने चलन बदलाचा उपाय त्वरित अंमलात आणावा, अशी सूचना मार्क्सवादी खासदार ज्योतिर्मोय बासू यांनी आज येथे केली. ते पुढे म्हणाले, 1970 साली काळा पैसा 7000 कोटी रुपये होता.
ज्यावेळी वांछू कमिटीने काळा पैशाबाबत चलन बदलाची सूचना केली होती त्याच वेळी चलनबदलाचा निर्णय सरकारने घेतला असता तर काळा पैशाची प्रचंड वाढ व जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत वाढ या गोष्टींना आळा बसला असता व सध्याची अफाट
महागाई निर्माण झाली नसती. चलन बदलाचा निर्णय घेताना सरकारने बॅंकेतील लॉकर्स व बॅंकेतील ठेवी यांना सील ठोकावीत. तसेच बॅंकेत ठेवलेल्या ठेवींचा संबंध या ठेवीदारांच्या इन्कमटॅक्स हिशेबाशी जोडण्यात यावा.
ऐतिहासिकदृष्ट्या कोठारी यांच्या आठवणींना फार महत्त्व
पुणे – महाराष्ट्राच्या इतिहासाच्या दृष्टीने कोठारी यांच्या आठवणी फार मोलाच्या आहेत, असे उद्गार प्रा. गं. बा. सरदार यांनी काढले. प्रभातकार वा. रा. कोठारी यांच्या “जुन्या आठवणी’ या पुस्तकाचे प्रकाशन करताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य मा. प. मंगुडकर होते.
राज्यात एक लाख विहिरी खोदण्याची योजना
पुणे – महाराष्ट्र सरकार या वर्षी शेतीला पाणी पुरवठा करण्यासाठी एक लाख विहिरी खोदण्याचा व दोनशे कूपनलिका बसविण्याचा कार्यक्रम हाती घेणार आहे. ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध करून देण्यासाठी बावीसशे पंप बसविण्याचीही योजना आहे. त्यामुळे दोन हजारांहून अधिक खेड्यांना पिण्याच्या पाण्याच्या सोयीचा फायदा मिळेल अशी माहिती या योजनेचे संचालक भा. स. करकरे यांनी दिली.