हवाई दल स्थापना दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन
पुणे- सुखोई, ब्रम्होस, आकाश आदी क्षेपणास्त्राचे प्रदर्शन.. युद्धाच्या थरारक घटनांना मिळालेला उजाळा.. सांस्कृतिक कार्यक्रम, अशा भरगच्च कार्यक्रमांनी आणि देशप्रेमाने भारवलेल्या वातावरणात हवाई दलाचा 89 वा स्थापना दिवस शुक्रवारी साजरा झाला.
यानिमित्त लोहगाव येथील एअरफोर्स स्टेशन येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते.
यानिमित्त आणि 1971 च्या युद्धाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त एअरफोर्स स्टेशन येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी एअर स्टेशनचे प्रमुख एअर कॅमोडर वीरेंद्र असुदान, निवृत्त एअर मार्शल ए. आर. गांधी आणि निवृत्त वायुसेना अधिकारी उपस्थित होते.
भारत- पाकिस्तान युद्धाचा सुवर्ण महोत्सव साजरा करण्यासाठी पुण्यात दाखल झालेल्या स्वर्णिम विजय मशालीचे यावेळी स्वागत करण्यात आले. गांधी यांनी मशालीला पुष्पचक्र अर्पण करून 1971 च्या युद्धातील शहिदांना आदरांजली वाहिली.
या युद्धात सहभागी झालेल्या विंग कमांडर सुरेश कर्णीक, एअर कमोडोर एम. सिंग, एअर कमोडोर देओस्कर, ग्रुप कॅप्टन एन. जी. जुन्नरकर, ग्रुप कॅप्टन एच. सरदेसाई, ग्रुप कॅप्टन डी. के. दिघे आदींचा सत्कार केला.
पुण्यातील अनेक ऐतिहासिकांच्या वास्तुंच्या आवारात हवाई दलातील जुनी विमाने ठेवण्यात आली आहेत. या सर्व विमानांची रंगरंगोटी आणि नूतनीकरण करण्यात येत आहे. करोनाच्या कालावधीत देखील भारतीय हवाई दलाने महत्त्वाची कामगिरी बजावली. ऑक्सिजन प्लॅंट आणि करोना प्रतिबंधात्मक लस संपूर्ण देशात पोहचविण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले.
क्षेपणास्त्रांचे प्रदर्शन
या विशेष कार्यक्रमात लढाऊ विमान “सुखोई एमकेआय 30′, “ब्राह्मोस क्षेपणास्त्र’, “आकाश’ क्षेपणास्त्रासह हवाई दलाच्या विविध शस्त्रांचे प्रदर्शन भरविले होते. यासह भारतीय हवाई दलाच्या इतिसाहाची साक्ष देणाऱ्या विविध बाबींची मांडणी यावेळी केली होती.
हवाई दलाची देदीप्यमान कामगिरी
भारतीय हवाई दलाने 1971 मध्ये झालेल्या युद्धात देदीदप्यमान कामगिरी करत शत्रुला धूळ चारली. गगन भरारी घेत शत्रुंची विमाने पाडली. यात भारतीय विमानांचेही नुकसान झाले. मात्र, भारतीय अभियंत्यांनी मोलाची कामगिरी बजावत काही तासांत ही विमाने पुन्हा उड्डाणासाठी सज्ज केली. या एकत्रित प्रयत्नांमुळेच या युद्धात पाकिस्तानला अपमानजनक पराभव स्वीकारावा लागला, असे म्हणत 1971 च्या युद्धातील थरारक घटनांचा उलगडा या युद्धातील सहभागी झालेल्या वैमानिकांनी केला.