हिमांशू
खरं तर हे सगळं बोलायची ही वेळ नाही; परंतु हे पूर्णपणे विषयांतरही नाही. पश्चिम महाराष्ट्राला पुराचा जोरदार फटका बसला आहे आणि ज्यांचं सर्वस्व वाहून गेलं, त्यांच्या डोळ्यांत पाणी आहे. ते पुसण्यासाठी हजारो हातही सरसावले आहेत. त्या हातांचं आणि भरल्या डोळ्यांचं भान ठेवून नऊ वर्षांच्या एका चिमुरडीच्या अश्रूंकडे लक्ष वेधावंसं वाटतं. अतिवृष्टी आणि पुराचाच नव्हे तर दुष्काळासह अन्य नैसर्गिक आपत्तींचा थेट संबंध पर्यावरणाशी आहे आणि तंत्रमंत्राच्या नशेत पर्यावरण हेही एक विज्ञान आहे, हे आपण जाणूनबुजून विसरलो आहोत. जागतिक तापमानवाढीचा वेग कमी करण्यासाठी, कार्बन उत्सर्जन रोखण्यासाठी वेगवेगळे आंतरराष्ट्रीय करार होतात; पण मूठभरांच्या स्वार्थी दबावामुळं त्यांची अंमलबजावणी होत नाही, हे रोकडं वास्तव आहे.
या पार्श्वभूमीवर, मणिपूरमधल्या व्हॅलेन्टिना एलांगब नावाच्या छोट्याशा मुलीची संवेदनशीलता लक्ष वेधून घेते. ही मुलगी जोरजोरानं रडत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. या वयातली अनेक मुलं, अनेक कारणांसाठी ओक्साबोक्शी रडतात. मग व्हॅलेन्टिनाच्या रडण्यात काय वेगळेपण होतं? हा व्हिडीओ जेव्हा मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांच्यापर्यंत पोहोचला, तेव्हा तिच्या रडण्याचं कारण समजलं. या चिमुकलीनं नदीकाठी दोन झाडं लावली होती. पण कालवा काढण्यासाठी प्रशासनानं ती तोडून टाकली. रोजच्याप्रमाणं झाडांची देखभाल करण्यासाठी ती नदीकाठी पोहोचली तर झाडं गायब!
आपली लाडकी झाडं तोडल्याचं पाहून व्हॅलेन्टिनाने हंबरडा फोडला. कुणीही, कितीही समजूत घातली तरी तिचं रडणं थांबेना. मुख्यमंत्र्यांना तिच्या रडण्याचं कारण समजल्यानंतर त्यांनी तिला राज्याची “ग्रीन ऍम्बेसेडर’ म्हणजे हरितदूत बनवलं. व्हॅलेन्टिनाने लावलेली दोन झाडं तिच्यापेक्षा उंच झाली होती. त्यांची वाढ सातत्यानं पाहण्याचा तिला छंद जडला होता. आता या दोन झाडांची भरपाई वीस झाडं लावून करायचं तिने ठरवलं आहे. खरं तर एक झाड तोडावं लागलं तर पाच झाडं लावायची, असा नियम आपल्याकडे आहे; परंतु तो किती पाळला जातो हे उघड गुपित आहे.
पावसाळा आल्यावर नदीकाठचे लोक पुराच्या भीतीनं खचतात, तर पर्यावरणवाद्यांचे फोटोसेशनसह वृक्षारोपणाचे कार्यक्रम सुरू होतात. लावलेल्या रोपट्यांपैकी किती जगणार, तोडलेल्या झाडांइतकी उंच कधी होणार आणि तोपर्यंत नव्यानं किती मोठी झाडं तोडली जाणार, याचा आलेख कुणी मांडतच नाही. पर्यावरणीय संकटांची तीव्रता आणि वारंवारिता इतकी प्रचंड आहे की, अस्तित्वात असलेली शक्य तेवढी मोठी झाडं आता वाचवली पाहिजेत. पण रस्ते आणि इतर विकासकामांसाठी वड-पिंपळ तोडून कण्हेर लावण्याचे सोपस्कार पार पाडले जातात. पुरात वाहून गेलेली माती हे आपल्याला “नुकसान’ कसं वाटत नाही?
मातीची धूप रोखण्याबरोबरच एक झाड सात जणांना प्राणवायू देतं. 41 हजार किलोमीटर प्रवास करणारं वाहन जेवढा कार्बन उत्सर्जित करतं, तो एक हेक्टर क्षेत्रातली झाडं शोषून घेतात. तरीसुद्धा 2015 ते 2018 या कालावधीत देशातलं 20 हजार हेक्टर जंगल आपण साफ केलं. जगभरात प्रतिव्यक्ती 422 झाडं हे सरासरी प्रमाण असताना भारतात मात्र माणशी केवळ 28 झाडं शिल्लक आहेत, याचं वैषम्य आपल्याला वाटणार आहे की नाही?