नवी दिल्ली : देशात ओमायक्रॉनच्या वाढत्या संकटावर आता केंद्र सरकार देखील अलर्ट झाले आहे. त्याच पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेश निवडणूक पुढे ढकलली जावी असा सल्ला अलाहाबाद उच्च न्यायालयाने सरकारला दिला आहे. उच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाकडे निवडणूक पुढे ढकलण्याची विनंती केली आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही राज्यात निवडणुकीसंबंधी प्रचारसभांवर बंदी घालण्याची आणि ओमायक्रानचे रुग्ण वाढत असल्याने निवडणूक काही काळासाठी पुढे ढकलण्यासंबंधी विचार करण्याची विनंती केली आहे.
“जर सभावंर बंदी आणली नाही, तर दुसऱ्या लाटेपेक्षाही वाईट परिणाम दिसू शकतात,” असे न्यायमूर्ती शेखर यादव यांनी यावेळी सांगितले. तसेच आयुष्य असेल तरच जग आहे असेही म्हटले.
कोर्टात रोज शंभरहून अधिक केसेसवर सुनावणी होत असून यामुळे मोठी गर्दी होत आहे, तसेच गर्दी करणारे सोशल डिस्टन्सिंगचंही पालन केलं जात नसल्याचं सांगताना कोर्टाने हे निरीक्षण नोंदवले. “ओमायक्रॉनचे रुग्ण वाढत असल्याने करोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे,” असे न्यायमूर्तींनी यावेळी सांगितले. यावेळी त्यांनी काही बातम्यांचा संदर्भ देत वाढणारे करोना रुग्ण आणि काही देशांनी जाहीर केलेल्या लॉकडाउनसंबंधी माहिती दिली.
“ग्रामपंचायत आणि पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत अनेक लोकांना संसर्ग झाला आणि त्यातील काहींचा मृत्यू झाला,” असं न्यायमूर्तींनी यावेळी सांगितलं. यावेळी त्यांनी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्ष प्रचारसभांचे आयोजन करत असून यावेळी करोनाच्या नियमांचे पालन करणे अशक्य असल्याकडेही लक्ष वेधले.
न्यायमूर्ती शेखर यादव यांनी यावेळी निवडणूक आयोगाला कोणत्याही प्रकारच्या सभा आणि गर्दींना रोखावं अशी विनंती केली. तसंच राजकीय पक्षांना दूरदर्शन किंवा वृत्तपत्रांच्या माध्यमातून प्रचार करण्यास सांगावं असा सल्ला दिला. सर्व भारतीय जगण्याचा अधिकार आहे याचीही त्यांनी यावेळी जाणीव करुन दिली.