बलिया -उत्तर प्रदेशच्या विधानसभेच्या निवडणूकीतून उत्तर प्रदेशमध्ये सत्तेवर येण्यापासून भाजपला रोखण्यास समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव हे सक्षम नाहीत, अशी टीका “एआय-एमआयएम’ पक्षाचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अखिलेश यांनी अलिकडेच खोचक टीका केली होती. पंतप्रधान गेल्या 7 वर्षांपासून केवळ चहा करण्यात व्यस्त होते आणि निवडणूकीच्या सुमारास त्यांना उत्तर प्रदेशातील मोकाट जनावरांचा मुद्दा लक्षात आला, असे अखिलेश म्हणाले होते. त्या अनुषंगाने ओवेसी यांनी अखिलेश यांना लक्ष्य केले आहे.
बलिया जिल्ह्यातील सिकंदरपूर शहरातील जाहीर सभेमध्ये बोलताना ओवेसी यांनी अखिलेश यांची भाजपला रोखण्याची क्षमताच नसल्याची टीका केली आहे. अखिलेश यादव यांनी 2017 च्या विधानसभेच्या निवडणूकीसाठी कॉंग्रेसबरोबर आघाडी केली होती. त्यानंतर 2019 मध्ये लोकसभेच्या निवडणूकीसाठी बसपाबरोबरही त्यांनी आघाडी केली होती. मात्र उत्तर प्रदेशात सरकार स्थापन करण्यापासून भाजपला ते रोखू शकले नाहीत, अशी टीका ओवेसी यांनी केली. पंतप्रधान मोदी जरी दिल्लीत चहा बनवण्यात व्यस्त होते, तरी उत्तर प्रदेशात सरकार स्थापण्यात कमी पडले नाहीत, अशी पुष्टीही ओवेसी यांनी जोडली. भाजपपासून सुटकेसाठी भागीदारी संकल्प मोर्च्याला पाठिंबा देण्याचे आवाहनही त्यांनी केले.