नवी दिल्ली -एका पत्रप्रपंचावरून कॉंग्रेसमध्ये निर्माण झालेली अस्वथता कायम असल्याचे सूचित होत आहे. पत्र मोहिमेत सहभागी झालेले माजी केंद्रीय मंत्री जितीन प्रसाद यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी कॉंग्रेसच्या उत्तरप्रदेशातील एका जिल्हा शाखेने केली.
त्याविषयी पक्षाचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. कॉंग्रेसने स्वपक्षीयांना लक्ष्य करण्याऐवजी भाजपवर सर्जिकल स्ट्राईक करावेत, असे त्यांनी म्हटले.
मागील काही दिवसांपासून कॉंग्रेसच्या 23 ज्येष्ठ नेत्यांनी पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांना पाठवलेले पत्र चर्चेचा आणि पक्षांतर्गत मतभेदांचा विषय बनले आहे. पक्षात संघटनात्मक पातळीवर तातडीने सुधारणा करतानाच पूर्णवेळ अध्यक्ष निवडावा, अशी मागणी त्या पत्रातून करण्यात आली. त्या पत्रावरून सोमवारी कॉंग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत आणि बाहेरही मोठे घमासान झाले.
कार्यकारिणी बैठकीत पत्रमोहिमेत सहभागी झालेल्या नेत्यांना लक्ष्य करण्यात आले. तशातच बुधवारी उत्तरप्रदेशातील कॉंग्रेसच्या लखीमपूर खेरी जिल्हा शाखेची बैठक झाली. त्यामध्ये उत्तरप्रदेशातील नेते असणाऱ्या प्रसाद यांच्याविरोधात ठराव मंजूर करण्यात आला.