शिक्रापूर – पुणे जिल्ह्यासह परिसरात मोठ्या उत्साही वातावरणामध्ये थाटात गौरींची स्थापना झाली आहे. जातेगाव खुर्द (ता. शिरूर) येथील एका तृतीयपंथीने देखील प्रथमच गौरींची स्थापना केली आहे.
गौरीने भाद्रपद महिन्यामध्ये शुद्ध अष्टमीला असुरांचा संहार केला तेव्हापासून अखंड सौभाग्य प्राप्त होण्यासाठी स्त्रिया महालक्ष्मी गौरीची प्रतिष्ठापना करतात, अशी यामागील आख्यायिका आहे. त्यापद्धतीने सर्वत्र महिला घरामध्ये मोठ्या थाटात गौरींची स्थापना करत असतात. जातेगाव खुर्द येथील माधुरी प्रल्हाद बन या तृतीयपंथीने देखील घरामध्ये गौरीची स्थापना करण्याचा निर्णय घेतला.
यावेळी त्यांच्या शेजारील महिला व साथीदारांच्या मदतीने घरामध्ये गौरीची स्थापना करत विविध प्रकारचे पदार्थ तसेच आदी साहित्यांची आरास या गौरीला देण्यात आली. या कार्यासाठी माधुरी बन यांना आरती बेल्हे, विजया गायकवाड यांचे मोलाचे सहकार्य लाभले. माधुरी यांचे त्यांच्या पंथातील गुरु असलेले शिक्रापूर येथील रविनाथ गुरु तसेच येरवडा पुणे येथील रेखा रफिक शेख व आशा काशीम शेख यांनी त्यांच्या शिष्याने केलेल्या या गौरी स्थापनेस भेट दिली आहे.
माधुरी बन यांनी गौरी स्थापना करून समाजाला एक वेगळा संदेश दिला आहे. त्यामुळे नागरिकांनी त्यांचा आदर्श घेतला पाहिजे, असे मत माधुरी यांच्या घरी दर्शनासाठी भेट देणारे गुरु रविनाथ तसेच पुणे येथील गुरु रेखा रफिक शेख यांनी व्यक्त केले.
मी घरात प्रथमच गौरीची स्थापना केलेली असून त्यास माझ्या गुरूंनी भेट दिली आहे. त्यामुळे सर्व वातावरण प्रसन्न झालेले आहे. यापुढे प्रत्येक वर्षी गौरींची स्थापना करणार असून त्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने वाढ करणार आहे.
-माधुरी बन, तृतीयपंथी जातेगाव