मंचर – आदिवासी भागात विविध संघटनांनी समाजामध्ये दुही पाडण्याचे काम करु नये. असे आवाहन माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी गावभेट दौऱ्यात आहुपे (ता. आंबेगाव) येथे केले.
आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील तळेघर, म्हाळुंगे, आहूपे, डोण, असाणे, बोरघर येथे वळसे पाटील व खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचा गावभेट दौरा झाला. यावेळी विविध गावात आदिवासी ग्रामस्थांनी वीज, पाणी, रस्ता, रोजगार, पर्यटन, शिक्षण याबाबत विविध समस्या मांडल्या.
वळसे पाटील म्हणाले, आदिवासी तरुण भरपूर शिकले; परंतु नोकरी मिळत नसल्यामूळे तरुणांमध्ये नैराश्य येत आहे. काही तरुण धार्मिक मुद्द्यांकडे वळाले आहेत. समाजात तेढ निर्माण करणाऱ्या गोष्टींपासून लोकांनी सावध राहीले पाहिजे.
यावेळी खासदार कोल्हे यांनी आदिवासी भागातील नागरिकाचे जीवनमान उचविण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन दिले. यावेळी भीमाशंकर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, माजी समाजकल्याण सभापती सुभाष मोरमारे, पंचायत समिती माजी सभापती संजय गवारी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती सचिन पानसरे, संदीप चपटे, माजी सभापती प्रकाश घोलप, इंदुबाई लोहकरे, जनाबाई उगले, शरद बॅंकेचे संचालक मारुती लोहकरे, प्रदीप अमोंडकर, संदिप चपटे, शामराव बांबळे, संजय केंगले व परिसरातील सरपंच व ग्रामस्थ उपस्थित होते.