मंचर – गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियाच्या माध्यमातून वादग्रस्त पोस्ट, कमेंट टाकून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशा दोषी व्यक्तींवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सतीश होडगर यांनी दिला.
मंचर नगरपंचायत येथे आयोजित शांतता कमिटी मिटींगमध्ये पोलीस निरीक्षक सतीश होडगर बोलत होते. यावेळी मंचर नगरपंचायतीचे मुख्याधिकारी गोविंद जाधव, संजय थोरात, राजाराम बाणखेले, दत्ता गांजाळे, मीराताई बाणखेले, सतीश बेंडे पाटील, वसंतराव बाणखेले, संदीप बाणखेले, जे. के. थोरात, मंगेश बाणखेले, शशिकांत बढे, प्रवीण मोरडे, गणेश खानदेशे, जगदीश घिसे, विकास बाणखेले, स्वप्ना पिंगळे, कल्पेश बाणखेले, नवनाथ थोरात याच्यासह मान्यवर उपस्थित होते.
ऍड. अविनाश रहाणे म्हणाले, चुकीचे काम करणाऱ्यांचे समर्थन कुणी करू नये. विधानसभा, लोकसभा, मंचर नगरपंचायत, जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका पार पडेपर्यंत मंचर पोलीस ठाण्याने दर दोन महिन्यांनी शांतता समितीची बैठक घ्यावी.
संजय थोरात म्हणाले, मंचर शहरात सर्व जाती-धर्म लोक गुण्यागोविंदाने राहत असून यापुढेही सामाजिक सलोखा राखून व समाजाप्रती आपले काहीतरी देणे आहे. ही भावना मनात ठेवून सर्वांनी एकत्रित राहणे गरजेचे आहे. यावेळी सुरेश भोर, दत्ता थोरात, संतोष खामकर, डी. के वळसे पाटील, आशिष पुगलिया यांची भाषणे झाली.
सोशल मीडियाच्या माध्यमातून काही तरुण तेढ निर्माण करण्यासाठी चुकीच्या पोस्ट किंवा स्टेटस ठेवत असतात. पोलीस प्रशासनाने अशा तरुणांना ताब्यात घेऊन तात्काळ कडक कारवाई करावी. त्यांना गंभीर शिक्षा होईल, अशी कलमे त्यांच्यावर लावावी. जेणेकरून इतर कोणी अशा प्रकारे पुन्हा गुन्हा करणार नाही.
-राजू इनामदार, अध्यक्ष आंबेगाव तालुका कॉग्रेस आय.