नवी दिल्ली – केंद्रीय गृह मंत्रालयाने पश्चिम बंगाल सरकारला नव्याने पत्र पाठवून तीन आयपीएस अधिकाऱ्यांना तातडीने केंद्रीय प्रतिनियुक्तीवर पाठवण्याची सूचना केली. त्यामुळे संतापलेल्या बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मोदी सरकारवर शाब्दिक पलटवार केला. त्यातून दोन्ही सरकारांमधील संघर्ष तूर्त थांबणार नसल्याचे संकेत मिळाले.
मागील आठवड्यात भाजपचे अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी बंगालचा दौरा केला. त्यावेळी त्यांच्या ताफ्यावर हल्ल्याची घटना घडली. नड्डा यांच्या सुरक्षेची जबाबदारी भारतीय पोलीस सेवेतील (आयपीएस) तीन अधिकाऱ्यांवर सोपवण्यात आली होती. त्या अधिकाऱ्यांची कर्तव्यात कसूर केल्याबद्दल बदली करण्याची सूचना करत केंद्रीय गृह मंत्रालयाने त्यांना प्रतिनियुक्तीवर बोलावले.
मात्र, बंगाल सरकारने त्यांना आपल्या सेवेतून मुक्त करण्यास नकार दर्शवला. त्यामुळे केंद्रीय गृह मंत्रालयाने बंगाल सरकारला पुन्हा पत्र पाठवले आहे. संबंधित आयपीएस अधिकाऱ्यांना नवी जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे त्यांना तातडीने पाठवले जावे, असे पत्रात नमूद करण्यात आले. त्यावर ममतांनी तीव्र प्रतिक्रिया दिली.
केंद्रीय गृह मंत्रालयाची कृती घटनाबाह्य आणि अस्वीकारार्ह आहे. राज्याच्या यंत्रणांवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न यशस्वी होऊ दिले जाणार नाहीत. लोकशाहीविरोधी शक्तीसमोर आम्ही झुकणार नाही, असा इशारा ममतांनी दिला.