लॉकडाऊनचा परिणाम; उन्हाळीसुट्टीत चिल्लीपिल्ली घरातच
– महादेव जाधव
फुरसुंगी – मामाच्या गावाला जाऊ या… हे काव्य आता फक्त पुस्तकामध्ये वाचायला मिळते. गेल्या काही वर्षांपासून वाढत्या शहरीकरणामुळे आणि आता करोनामुळे तर मामाचा गाव हरवलं आहे पूर्ण ओस पडलं आहे. त्यामुळे उन्हाळ्याच्या सुट्टीत येणारं आमत्रण यावर्षी काही आलचं नाही. त्यामुळे गेली 45 पेक्षा जास्त दिवसांपासून चिल्लपिल्ली घरातच थांबून (डांबून) आहेत.
मामाच्या गावात असलेली घुंगराची बैलगाडी (बैलबंडी) मागे पडली आणि झुक झुक आगीनगाडी आली. विजेवर एक्सप्रेस धावू लागल्याने धुरांच्या रेषाही बंद झाल्या. चारचाकी गाड्या सर्रासपणे सगळ्यांकडच आल्याने मामा मोठा तालेवार… राहिलाच नाही. एखादा कार्यक्रम असला तरच मामाकडे मुक्काम. गेल्या काही वर्षांत तर मामाचं गावच शहरासारखं झालं. त्यात गावपण हरवून गेलं.
…आणि आता तर करोनामुळे गावचं गावपणच गेलं. शहरात राहणाऱ्या आपल्या बहिणीला, भाच्याला काळीजीपोटी मामाला सांगावं लागलं की, गावाला येऊ नका. उन्हाळ्याच्या सुट्टीत घरातच रहा. मामाला तरी काय म्हणणार… गावचा रस्ताच काटे, काठ्या लावून बंद केलेला. रानातला रस्तापण दगडी टाकून बंद. गल्ली बंद आणि दारंही बंद. बाजार बंद, दुकान बंद, विहिर बंद इतकच काय तर गावातल भल मोठं देऊळ पण बंद. गावात कुणाला येऊच द्यायचे नाही. असं मामाचं गाव झालेले असताना तिथं जाणार तरी कसं? करोनानं शहरच नाही तर गाव ही बदलून टाकलं. यावर्षी केवळ मामाचं गाव नाही हरवंल तर शहरात आलेल्याच गाव सुटलं.
जळगावहुन पुण्यात आलेले चेतन पाटील म्हणतात की, यात्रा-जत्रा, उत्सव, लग्नसमारंभ, घरगुती कार्यक्रम अशा काही तरी निमित्ताने गावचा रस्ता धरता येत होता. पण, यावर्षी करोनामुळे सगळेच कार्यक्रम रद्द झाले आहेत. लॉकडाऊन वाढत असल्याने इच्छा असूनही कुठे जाता येत नाही.
विद्यार्थी राजविर जाधव सांगतो की, परीक्षा संपली की, उन्हाळ्याच्या सुट्टीत मामाच्या गावाला जायचे वेध लागायचे. करोनामुळं शहरवासियांचेच नव्हे, तर गावाची जीवनपद्धतीही चाकोरीबद्ध झाली आहे.
कोंढवा येथील प्रतिभाताई पवार विद्यालयाचे मुख्याध्यापक भानुदास रीठे म्हणाले की, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी खासगी शाळा-महाविद्यालयांनी ऑनलाइन शिक्षण पद्धती सुरू केली आहे. त्याचा विद्यार्थ्यांना चांगला फायदा होत आहे.
प्राध्यापक गणेश शेजवळ म्हणाले की, मामाचा गाव मोठा…, असला तरी हा गाव करोनामुळे हरवून गेला आहे. यामुळे यावर्षी मुलाबाळांना मामाच गाव म्हणजेच त्यांच्या बायाबापड्यांनाही माहेर गाठता आलेलं नाही.