थेऊर (प्रतिनिधी) – करोना संसर्गामुळे सुरू असलेल्या लॉकडाऊनमध्येही जिल्हयातील सरपंच किंवा उपसरपंच यांच्या राजीनाम्यामुळे अथवा इतर कारणाने रिक्त झालेल्या पदाची निवड होण्यासाठी ग्रामपंचायतीची बैठक घेण्यात यावी. सरपंच व उपसरपंच यांची निवड करण्यात यावी असे स्पष्ट निर्देश महाराष्ट्र शासनाने एका परिपत्रकाद्वारे बजावले आहेत. यामुळे ग्रामपंचायतीला कारभारी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
ग्रामपंचायतीचे सरपंच अथवा उपसरपंच यांच्या निवडप्रक्रियेच्या बैठकीदरम्यान शासनाने कोव्हिड-१९ बाबत दिलेल्या मार्गदर्शक सुचनांचे पालन करणे बंधनकारक आहे. याबाबत संबंधिताना आवश्यक सुचना देण्याचे आदेश सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना राज्य शासनाचे अतिरिक्त मुख्य सचिव अरविंद कुमार यांनी दिले आहेत.
राज्यात काही ग्रामपंचायतींच्या रिक्त असलेल्या सरपंच व उपसरपंच पदांच्या निवडी होण्यासाठी आवश्यक असलेली ग्रामपंचायतीची बैठक घेण्यास संमती. या बैठकांमध्ये #COVID_19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक सर्व सूचनांचे तंतोतंत पालन करावे- ग्रामविकास मंत्री @mrhasanmushrif यांची सूचना
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) May 13, 2020
करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी स्थानिक स्वराज्य निवडणुकीशी संबंधित कामकाज स्थगित करण्याबाबतची सूचना राज्य निवडणूक आयोगाने 17 मार्च रोजी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिली होती. यामुळे ग्रामपंचायतीच्या स्तरावरील निवडणूक रणधुमाळी ही पुर्णपणे स्थगित करण्यात आली होती.
कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामपंचायतीकडून सरपंच व उपसरपंच निवडीबावत वारंवार विचारणा होत आहे. ग्रामपंचायतींच्या मासिक सभेत सरपंच व उपसरपंच यांच्या राजीनामा सादर झाल्यानंतर या पदावर निवडीच्या आदेशाकरीता कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव देण्यात आला आहे. यानंतर सरपंच व उपसरपंच यांची निवड करण्यात यावी, असे निर्देश महाराष्ट्र शासनाने दिले आहेत. यामुळे ग्रामपंचायतीला कारभारी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.