मुंबई -शिवसेना नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जुनमध्ये बंड पुकारल्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखालील शिवसेनेत खळबळ उडाली. शिवसेनेतील फुटीवरून उद्धव ठाकरे यांचे आमदार आणि खासदारांवर असलेले नियंत्रणही गमावल्याचे आता दिसून येत आहे. परंतु शिवसेनेवरील ठाकरें’चा वारसा ढासळत चालला आहे की नाही हे येत्या काळात लवकरच समजेल, असे राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे. तसेच शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिवंगत बाळ ठाकरे यांच्या वारशाचे भांडवल करू शकत नसल्यामुळे शिवसेनेत उभी फूट पडणे अटळ आहे, असे त्यांचे मत आहे.
बाळासाहेब ठाकरे यांनी 56 वर्षांपूर्वी मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर शिवसेनेची 1966 मध्ये स्थापना केली होती आणि नंतर 1990च्या दशकात ते हिंदुत्वाच्या अजेंड्याकडे वळले. दरम्यान, छगन भुजबळ आणि नारायण राणे यांनी काही आमदारांसह शिवसेनेत फूट पाडली होती. पण हे दोन नेते वगळता इतर आमदारांनी पुन्हा पक्षात प्रवेश केला.
2003 मध्ये उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे नेतृत्व हाती घेतल्यानंतर नारायण राणे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) प्रमुख आणि चुलत बंधू राज ठाकरे यांच्यासारख्या नेत्यांच्या असंतोषाचा सामना करावा लागला. परंतु तेव्हा बाळ ठाकरे हयात होते.
बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर उद्धव ठाकरे यांनी बदलेल्या भूमिका आणि कॉंग्रेस-राष्ट्रवादीसोबत केलेल्या हातमिळवणीमुळे शिवसेनेत संभ्रम निर्माण झाला. तसेच उद्धव ठाकरेंनी कधीही वारशाचे भांडवल आणि आपले नेतृत्व प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न केले नाही. त्यांनी प्रत्येकाला गृहीत धरले आणि पक्षावरील पकड दिवसेंदिवस कमी होत गेली. यामुळे शिवसेनेत शिंदे यांचे बंड उभारून आल्याचे मत राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केले.