Uddhav Thackeray : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी निकाल देण्यापूर्वी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात झालेल्या भेटीवर आता ठाकरे गटाने आक्षेप घेतला आहे. यासाठी ठाकरे गटाने चक्क सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत. त्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेते अनिल परब यांनी आज पत्रकार परिषद घेत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीवर आक्षेप घेतला. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी,”देशात लोकशाही आहे की नाही, हे ठरवणारा हा निर्णय असेल, असे त्यांनी म्हटले.
पुढे बोलताना त्यांनी,”जर न्यायमूर्ती (राहुल नार्वेकर) आरोपीला जाऊन भेटत असतील तर आम्ही त्या न्यायमूर्तींकडून काय अपेक्षा करावी? “असा सवाल उद्धव ठाकरे गटाकडून उपस्थित करण्यात आला आहे. शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी निकाल देण्यापूर्वी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात झालेल्या भेटीवर आक्षेप घेत ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे.
तसेच पुढे उद्धव ठाकरे यांनी,” हा खटला आहे ते देशामध्ये लोकशाही जिवंत राहणार की नाही? हे ठरवणारा निकाल असणार आहे. गेले दोन वर्ष त्यावर चर्चा, सुनावणी, उलट तपासणी सुरू आहे. गेल्या एप्रिलमध्ये सर्वोच्च न्यायालयाने योग्य वेळेत निकाल लावावा असं म्हटलं होतं. 31 डिसेंबर तारीख दिली होती. ज्याप्रमाणे सुनावणी सुरू होती तेव्हाच आमच्या लक्षात आलं होतं की वेळकाढूपणा करत आहेत, असे उद्धव ठाकरे म्हणाले. उद्या दहा जानेवराली 11:59 पर्यंत वेळ खेचतील मग निकाल देतील असं वाटतं, असेही म्हटले.
लवाद म्हणून अध्यक्ष महोदय दोन वेळेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना घरी जाऊन भेटले आहेत. याचा अर्थ होतो की आरोपीच न्यायाधिशाला जाऊन भेटले. ते मुख्यमंत्र्यांना तसं भेटले तर हरकत नाही पण खटला सुरू असताना ते भेटले. आरोपीला घरी जाऊन भेटणार असतील तर कोणत्या न्यायाची अपेक्षा करणार, असे उद्धव ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केले.
ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उल्हास बापट यांच्या मुलाखतीचा उल्लेख करत उद्धव ठाकरे यांनी सर्वानी ती मुलाखत ऐकायला हवी असे म्हटले,मुलाखतीत ते सांगत आहेत की किती वेळ काढला जात आहे. लोकशाहीचा खून यामुळे होतोय की काय अशी परिस्थिती आहे. त्यात ते उघड उघड भेटत आहेत.आम्ही सर्वोच्च न्यायालयाला विनंती करतो की तुमच्या डोळ्यादेखत हे घडत आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.