मुंबई : भाजपचे आमदार नितेश राणे यांनी एक ट्विट केल्याने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ माजली आहे. नारायण राणे यांनी जेव्हा शिवसेना सोडली तेव्हा त्यांना संपवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी सुपारी दिली होती, असा खळबळजनक आरोप भाजपचे आमदार नितेश राणे यांनी केला आहे. त्यांच्या आरोपाने एकच गोंधळ उडाला आहे.
नितेश राणेंनी ट्विट करत उद्धव ठाकरे यांच्यावर हा गंभीर आरोप केला आहे. त्यात त्यांनी,”आता म्याव म्याव संपू द्या, त्यानंतर आम्ही व्याजासकट वस्त्रहरण सुरु करु असा इशाराही नितेश राणेंनी दिला आहे. नितेश राणेंच्या या आरोपानंतर खळबळ उडाली आहे. यावेळी ते म्हणाले की, काल नाशिकचे आमदार सुहास कांदे यांनी एकनाथ शिंदे यांच्या सुरक्षेच्या संदर्भातील घटनेचा उल्लेख केला आहे. यावरुन शिवेसनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कोणत्या मानसिकतेचे आहेत हे महाराष्ट्राला समजलं पाहिजे. एकनाथ शिंदे यांच्याबरोबर झाले ते पहिले नाही. याच्या अगोदर पण असंख्य घटना घडल्या आहेत.
Just like Eknath Shinde ji .. several “suparis”were given to finish my father when he left the Sena.. by the so called sober and decent Paksha Pramukh!
Let the meow meow finish.. then we will start with the “Vastraharan” with interest 😊— nitesh rane (@NiteshNRane) July 23, 2022
नारायण राणे यांनी ज्यावेळी शिवसेना सोडली, त्याच्यानंतर असे अनुभव आले असल्याचे नितेश राणे म्हणाले. म्हणून योग्य वेळ आल्यानंतर आम्ही वस्त्रहरण करु असे नितेश राणेंनी म्हटले आहे. महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांच्याबाबत वेगळी प्रतिमा घडवली जात आहे. ते आजारी आहेत, ते सोज्वळ आहेत, असं दाखवलं जात आहे. पण ते जर दुसऱ्याच्या जीवावर उठत असतील, दुसऱ्याला मारण्यासाठी सुपाऱ्या देत असतील तर असा माणूस स्वच्छ मनाचा नसल्याचे नितेश राणे म्हणाले.
योग्य वेळी सगळी माहिती महाराष्ट्राच्या जनतेसमोर आणली जाईल असेही राणेंनी यावेळी सांगितले. काल सुहास कांदे यांनी जी घटना सांगितली. त्यानंतर मी ही माहिती समोर आणली आहे. फक्त एकनाथ शिंदे यांच्याबरोबर ही गोष्ट झाली नसल्याचे राणे म्हणाले. आज सगळीकडे फिरुन उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे सहानभुती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. पण महाराष्ट्राच्या जनतेला कळाले पाहिजे की उद्धव ठाकरे नेमके कसे आहेत, असेही राणे म्हणाले.
स्वत:चे वडील आजारी असल्याची चिंता यांनी वाटते पण दुसऱ्यांच्या वडलींना जेवणाच्या ताटावरुन उठवून अटक करण्याचा प्रयत्न होतो तेव्हा त्यांना काही वाटत नाही असेही नितेश राणे यावेळी म्हणाले. बाळासाहेब ठाकरे यांनी ज्यावेळी धमक्या येत होत्या, त्यावेळी राणेसाहेबांसारख्या शिवसैनिकांनी जीवाची पर्वा न करता तासनतास घराच्या बाहेर राहून संरक्षण दिले आहे. त्याच व्यक्तिला अशा सुपाऱ्या दिल्या जात असल्याचा आरोप राणेंनी केला.