नवी दिल्ली : शिवसेनेतून बंडखोरी करत एकनाथ शिंदे यांच्यासह ४० पेक्षा जास्त आमदारांनी राज्यातील सत्तांतर घडवून आणले. दरम्यान, यानंतर आता उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात शिवसेना नेमकी कोणाची यावरून कायदेशीर लढा सुरु झाला आहे. तसेच हा वाद आता निवडणूक आयोगापर्यंत गेला आहे. आयोगाने उद्धव ठाकरे आणि शिंदे गटाला बहुमताचा कागदोपत्री पुरावे सादर करण्याचा निर्देश दिला आहे.
निवडणूक आयोग दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकल्यानंतर सुनावणी करणार आहे. यासाठी ८ ऑगस्टपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे शिवसेनेचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाणही कोणाकडे राहणार याबाबतही ८ ऑगस्टला फैसला होणार आहे. एकनाथ शिंदेंसोबत शिवसेनेच्या ४० पेक्षा जास्त आमदारांनी बंड केल्यानंतर पक्षात मोठी फूट पडली होती. बंडानंतर शिंदे गटाने भाजपासोबत युती करत सत्ता स्थापन केली.
एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर शिंदे गटावर कारवाई करत शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. तर दुसरीकडे शिंदे गटाने खरी शिवसेना आमचीच असल्याचा दावा केला आहे. तसेच शिवसेनेचे चिन्ह धनुष्यबाणावरही शिंदे गटाकडून हक्क सांगण्यात आला आहे.
याबाबत शिंदे गटाने निवडणूक आयोगाला पत्र पाठवत आपल्याच गटाला शिवसेना पक्ष म्हणून मान्यता देण्यात यावी, अशी मागणी केली होती. आधी सर्वोच्च न्यायालयात याबाबत लढाई सुरु होती आता हा वाद निवडणूक आयोगापर्यंत पोहचला आहे. निवडणूक आयोग दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकूण घेऊन आपला निर्णय जाहीर करेलं. यासाठी दोन्ही बाजूच्या गटांना ८ ऑगस्टपर्यंत कागदोपत्री पुरावे सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.