ठाणे – साताऱ्याची उमेदवारी मिळवण्यासाठी उदयनराजे भोसले हे दिल्लीच्या तख्तासमोर नतमस्तक झाले. ते दिल्लीत जाऊन तिकीट द्या, तिकीट द्या, अशी विनवणी करत होते, ही गोष्ट महाराष्ट्रातील जनतेला देखील फारशी आवडणारी नाही, असे म्हणत शरदचंद्र पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी उदयनराजे यांना खोचक टोला लगावला.
आव्हाड म्हणाले की, छत्रपतींची कोल्हापूरची गादी असो किंवा सातारची गादी. या गादीबद्दल आम्हाला आदर आहे. छत्रपतींच्या वंशजांनी ही गादी आचारविचाराचे पालन करुन पुढे चालवली पाहिजे. पण उदयनराजे यांची कृत्य, दुष्कृत्य साताऱ्यात आणि सगळीकडे बघितली आहेत. त्यांचे वागणे गादीचा सन्मान ठेवणारे असते तर ठीक होते. महाराष्ट्राला एक परंपरा आहे.
आजही छत्रपतींच्या गादीला सर्वजण मान देतात, त्या गादीचा मान ठेवायला पाहिजे होता. आपण कोणासमोर झुकत आहोत, याचा विचार उदयनराजे यांनी केला पाहिजे होता. शशिकांत शिंदे हा अत्यंत गरीब घराण्यातून आलेला माणूस आहे. त्यांच्या घरची परिस्थिती काय होती हे राजेंनाही माहिती आहे. शरद पवारांनी कायम ज्याच्याकडे नेतृत्व करण्याची ताकद, हिम्मत, कर्तृत्त्व आहे त्यांना मोठं केलंय.
त्याचा वारसा काय हे कधीच बघितले नाही. शशिकांत शिंदे हा गरीब घरातला माथाडी कामगार आहे. अशा पार्श्वभूमीवर त्यांनी राजेंना अंगावर घेतला आहे. त्यामुळे खरा रयतेचा प्रतिनिधी शशिकांत शिंदे आहेत. शशिकांत शिंदेच जनतेला न्याय देऊ शकतात. सत्तेपुढे नतमस्तक होणारे कधीच न्याय मिळवून देऊ शकत नाही, अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली.